
राज्यातील अपघातांच्या घटना वाढ झाली असून रस्ते अपघाताचे (Accident) प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने अपघाताचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. आता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली.
या अपघातात माजी आमदार (MLA) आर.टी. देशमुख यांचे निधन झाले आहे, अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर (Latur) येथे पाठवण्यात आले होते. लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर, मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन लातूर गाठले, तसेच देशमुख कुटुंबीयांशी फोनवरुन संवादही साधला.
बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला आहे. या अपघातात माजी आमदार आर.टी.देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे तत्काळ आपले कार्यक्रम रद्द करुन लातूरला रवाना झाल्या आहेत. दरम्यान, आरटी देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार बनले होते. ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्यात परिचित होते.
मंत्री पंकजा मुंडेंचे सर्व कार्यक्रम रद्द
दरम्यान राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. किनीकर यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली.
बजरंग सोनवणेंकडून श्रद्धांजली
लातूर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आर. टी. देशमुख (जीजा) यांचे दु:खद निधन झाले. जीजांच्या जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.