
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची. कारण मुंबईतील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेल्या या मंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
यावर्षी मंडळातील कार्यकर्त्यांनी भाविकांना केलेली मारहाण, भाविकांवर केलेली दादागिरी यामुळे मंडळाचे नाव खराब झाले आहे. पण यासोबत यावेळी लालबागच्या राजाचे विसर्जन हे 36 तासांनंतर झाले. कारण भरतीमुळे लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर न येऊ शकल्याने बराच वेळ विसर्जन रखडले. पण रविवारी (ता. 7 सप्टेंबर) ओहोटी सुरू झाल्यानंतर गणपतीची मूर्ती तराफ्यावर घेऊन विसर्जित करण्यात आली. पण आता लालबागचा राजा मंडळाविरोधात महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आक्रमक झाली असून या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीला म्हणजेच शनिवारी (ता. 6 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता सुरू झाली. दरवर्षी ही लालबागच्या राजाचे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत विसर्जन होते. मात्र, यंदाच्या वर्षी मात्र 36 तासांनंतर म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाले. पण या विसर्जनावेळी झालेल्या गोंधळावरून आता कोळी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन चंद्र ग्रहणात केल्याने हिंदू धार्मिक्यांचे भावना दुखावल्या असून भाविकांचा दर्शनच्यावेळी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची तक्रार मच्छिमार समितीने केली आहे. मच्छिमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मच्छिमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची तक्रार करत लिहिले आहे की, लालबागच्या राज्याच्या विसर्जन प्रक्रियेत झालेल्या घोळामुळे बाप्पांचे विसर्जन चंद्र ग्रहण सुरू असताना झाल्याने लाखो गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक छळ सुरू आहे. असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. लालबागच्या राज्याची लोकप्रियता वाढल्यानंतर मंडळातील कार्यकारिणीतील सदस्यांनी संपूर्ण उत्सवाचे बाजारीकरण करणे सुरू केले. सामान्य भाविकांमुळे मंडळाला प्रसिद्धी आणि अफाट पैसा मिळू लागला, त्याच भाविकांची अवहेलना करण्याचा प्रताप मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला. एका सामान्य बापाच्या चिमुकल्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व भाविकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाल्यामुळे या अमानवी घटना भविष्यात घडू नये यासाठी तक्रार केली आहे.
तसेच, वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत आलेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन घडवून आणण्याच्या प्रयत्नात अपयश झाल्याचे दिसून आले. विसर्जन चंद्र ग्रहणात करणे हा फक्त बाप्पांचा अपमान नसून तो समस्त कोळी समुद्राचा आणि लाखो हिंदू भाविकांचा अपमान आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषी गुन्हेगारांवर फौजदारी कारवाई करावी. लालबागच्या राजाच्या दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करण्यात यावे. दर्शनासाठी होणारी अफाट गर्दी आणि व्हीआयपी संस्कृतीला आटोक्यात आणण्याकरिता दर्शन प्रक्रियेमध्ये बदल करून व्हीआयपी दर्शनासाठी फक्त एक दिवस देणे तसेच चेंगराचेंगरीचा प्रकार घडू नये म्हणून देखाव्याचे पंडाल बंधिस्त अवस्थेत न ठेवता ते मोकळ्या करण्यात यावे. कोळी समुदायाला लालबागच्या राजाचा विसर्जनाचा मान शाबूत करण्यात यावा, तसेच एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्याची मागणी मच्छिमार समितीने कडून करण्यात आली आहे. तर, ज्या समुदायाने बाप्पांची स्थापना लालबाग येथे केली, त्याच कोळी समुदायाला डावलण्याचे काम मंडळाकडून होत असल्याचा आरोप सुद्धा समितीकडून करण्यात आला.