विरोधकांच्या सूरात मित्रांचा सूर; हसन मुश्रीफ आणि संजय शिरसाट म्हणाले काय ?
अगदी थोड्याच वेळात मुंबईत मनसे-महाविकास आघाडी-डावे पक्ष यांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. 1 वाजता हा मोर्चा निघत आहेत. या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर येथून लोकलने चर्चगेटला पोहचले.
तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पण मोर्चाच्या स्थळाकडे कूच करत आहेत. इतर पक्षाचे नेतेही ही पोहचणार आहेत. या मोर्चाची वातावरण निर्मिती पूर्ण झाली आहे. या मोर्चाची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच मित्रपक्षांच्या मतचोरीवरील भूमिकेने भाजपला धक्का दिला आहे.
मोर्चाला आमचा विरोध नाही
निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बाबी या समोर येत असतात, त्यामध्ये ही एक नवीन, बोगस मतदार यादी आहेत, एका यादीमध्ये अधिक नाव आहेत असं काही लोकांचं आणि पक्षांचे मत आहे. आज त्यांनी जो मोर्चा काढला आहे, त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल
या मोर्चाला आमचा विरोध नाही, असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
यावर कायदेशीर इलाज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आशा बोगस मतदार याद्या कोण्या एका मतदार संघात नाहीत, तर महाराष्ट्रमध्ये आहेत.अशी सर्व घाण थांबली पाहिजे असे सर्व नागरिकांचे मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर मतदान होते, त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसतो. हा कोणता पक्ष करतो किंवा कार्यकर्ता करतो या वादात आता मी जात नाही. परंतु हे नसावे या मताचे आम्ही सुद्धा आहोत, असे मोठे वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी केले.
या मोर्चावरही त्यांनी तोंडसुख घेतले. ही स्टंट बाजी आहे, आणि यापूर्वी ते निवडणूक आयोगाला भेटले होते. लोकांना रस्त्यावर आणण्याचे कारण काय हे तेच त्यांनाच माहीत आहे. या माध्यमातून शक्ती प्रदर्शन, एक पक्षाचा प्रचार आणि आम्ही संघटित आहोत महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे दाखवण्याचा त्यांचा हा राजकीय स्टंट आहे. तुम्ही ज्या प्रश्नासाठी मोर्चा काढत आहात तो प्रश्न बैठकीत सोडवता आला असता यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरणं योग्य नाही असा आम्हाला वाटतं, असे शिरसाट म्हणाले.
हसन मुश्रीफांचे वक्तव्य चर्चेत
आजचा मोर्चा हा इंडिया याघाडीचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे काय झालं हे आपण पाहिले आहे. सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. पण ज्यावेळी मतदारांची कच्ची यादी तयार होते. त्यावेळी ही बाब निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. पण ती संधी विरोधकांनी गमावली होती. कितीही यंत्रणा असली तरी आपल्या देशाची लोकसंख्या आज 140 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यातील 20 टक्के सोडले तर बाकीचे मतदार आहेत. यामध्ये काही चुका होतात. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतला नाही. या चुका प्रशासन दूर करेलच. आजचा मोर्चा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांचा सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेण्यास आक्षेप आहे. या याद्या दुरुस्त करण्यास आमची काहीही हरकत नाही, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे.


