नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्ध आता निवळताना दिसत आहे.
दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जगाला काहीसा दिलासा मिळला आहे. दरम्यान भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तर याच वेळी इराणमधील नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
भारताची अमेरिका इराण युद्धावर पहिली प्रतिक्रिया
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मध्यपूर्वेतील युद्धासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात भारताने म्हटले आहे की, आम्ही अमेरिका इराणमधील युद्धविरामाचे स्वागत करतो आणि यामुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल अशा असा व्यक्त करतो असे भारताने म्हटले आहे. याशिवाय भारत नेहमीच शांतता, संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाने तणाव कमी करण्यावर भर देतो हेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
युद्धाच्या परिणामांवर चिंता व्यक्त
याच वेळी भारताने महिन्याभरात युद्धामुळे झालेल्या परिस्थितीवर आणि त्याच्या परिणामांवरही भाष्य केले आहे. या युद्धामुळे सामान्य जनतेला मोठ्या हालपेष्टा सहन कराव्या लागल्या. तसेच यामुळे जागतिक उर्जा पुरवठाही धोक्यात आला होता. यामुळे आता शांतता प्रस्थापित होऊन स्ट्रेट ऑफ होर्मुझ चा मार्ग विनाअडथळा सुरु राहिल अशी अपेक्षा भारताने केली आहे.
इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचे आदेश
दरम्यान याच वेळी भारताच्या इराणमधील दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी नवा आदेश जारी केला आहे. अमेरिका इराण यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर तातडीने देश सोडण्याचे आवाहन तेहरानमधील भारतीय दूतावासाने केले असून यासाठी हेल्पेलाईन नंबरही जारी करण्यात आले आहेत.
युद्धविरामानंतर पुढे काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धबंदीला दोन आठवड्यांची मंजुरी दिली आहे. तसेच युद्धविरामासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी केलेल्या प्रयत्नांचे अमेरिका-इराणने आभार मानले आहेत. येत्या शुक्रवारी (१० एप्रिल) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे इराणच्या १० कलमी प्रस्तावावर पुढील चर्चा होणार आहे. जगभरातून ही चर्चा यशस्वी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे.
