
महाराष्ट्रात सध्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीचा तपशील देखील सांगितला.पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘राज्यामध्ये आणि विशेषता मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच आणि पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात ऊस महत्त्वाचे पीक आहे आणि आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुरामध्ये काही ठिकाणी ऊस पडला आहे तर काही ठिकाणी तो वाहून गेला आहे. काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या पुरात किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्याची गरज होती. त्याबाबतची चर्चा आज आम्ही केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, उद्याच्या 12 तारखेला सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारसोबत झालेल्या नुकसानीबाबत कशा पद्धतीने चर्चा केली जाऊ शकते, याबाबत निर्णय घेण्यात येईल.
राज्य सरकारकडून ज्यांचे नुकसान झाले त्यांना मदत करण्याची गरज असताना ऊस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा ऊस उत्पादकाला मदत देण्याची गरज असताना त्याच्याकडून सक्तीने वसुली करणे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनी याबद्दल फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहे, असे शरद पवार म्हणाले.
मराठवाड्यातील परिस्थितीचा राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे दिलेला नाही. त्यामुळे अद्याप केंद्र सरकारकडून बाधितांना मदत होऊ शकलेली नाही. त्यामुळे माझा आग्रह आहे की राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत लवकर होईल हे बघावे.
चार दिवसापुर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांना या भेटीबाबत विचारला असता ते म्हणाले, ‘माळेगाव कारखाना संदर्भात काही इश्यूज होते. तसेच तिथे एक शिक्षण संस्था आहे त्याचा अध्यक्ष मी आहे. अजित पवार हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. अनेक इश्यूज असतात, त्याबाबत ही भेट असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.