
विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत ठाकरे कडाडले…
निवडणूक आयोय निवडणूक घेते, तर राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. याच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्याच दाखविणार नसेल तर काहीतरी घोळ आहे, असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत केला.
मतदार यादीमधील मतदाराचे वय ११७ आहे. यावरुन घोळ स्पष्ट होतो. जर मतदार यादीच पारदर्शी नसेल तर निवडणूक घेवू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली पाच वर्ष घेतलेल्या नाहीत. तुम्ही आधी निवडणूक मतदार यादीतील घोळ संपवा, सहा महिन्यानंतर निवडणुका घेतल्याने काही फरक पडत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सर्व नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्य शशिकांत शिंदे, काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
मतदार याद्यांमध्ये घोळ, राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी राज ठाकरे, मनसे अध्यक्षमला असे वाटते मतदान हे गोपनीय असते. पण मतदार यादी कशी गोपनीय असेल. निवडणूक आयोगाला निवडणुका लढवायच्या नाहीत. आम्हाला लढवायची आहे. काही मतदार याद्यांमध्ये मुलाचे किंवा मुलीचे वय हे त्यांच्या वडिलांपेक्षा मोठं दाखवण्यात आले आहे. नेमके कोणी कोणाला काढले कळत नाही.
जयंत पाटील म्हणाले की, ४५० मतदान असणार्या घरात शून्य मतदार अशी नोंद आहे. तर पालघरमध्ये ४०० मतदार एकच घरात आहेत. मध्य विधानसभा नाशिक येथे एकाच घरात ८०० मतदारांची नोंद आहे. एका व्यक्तीचे चार-चार वेळा नाव आहेत.सुषमा गुप्ता या महिलेचे नाव अनेक मतदार याद्यांमध्ये आहे. आम्ही मतदार याद्यांमधील त्रुटींचे पुरावेच निवडणूक आयोगाला दिले आहे. मतदार याद्यांमधील चुकांची दुरुस्ती करेपर्यंत निवडणुका घेवून नये, अशी मागणी आम्ही केली आहे.
आमचा प्रश्न हा आहे. सकाळी जी नावे असतात, संध्याकाळी ती नावे जातात. आम्ही हाच प्रश्न आयोगाला विचारला की, ही नाव कोणी काढली. निवडणूक आयोगाचा सर्व्हर कोण तरी दुसरा चालवतो का ? ही सिस्टीम कोणीतरी दुसरा चालवतो का ?
आम्ही विधानसभेला जी मतदार याद्या पहिल्या त्याच याद्या स्थानिक निवडणुकीला असतील तर किमान या मतदार याद्या तपासून बोगस मतदार काढून टाका, असे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले.
विधानसभा निवडणुकांच्या काळातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होत्या. याबाबत तक्रारही केल्या. गेली दोन दिवस आम्ही याबाबतच्या तक्रारी मांडल्या आहेत. मात्र आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आयोग उत्तर देण्यास तयार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
आम्ही हुकूमशाही खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे
आम्ही सर्व जण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. भाजपला निमंत्रण दिले आहे, पण ते आले नाहीत. जर मतदार याद्यांमध्येच घोळ आहे. या याद्या आम्ही घरी छापलेल्या नाहीत. लोकशाहीचा खेळ मांडला आहे. जर इलेक्शनपेक्षा थेट सिलेक्शन करुन मोकळे व्हा, असा टोला लगावत आता मतदार यादीतील घोळ संपेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवू नका, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही मतचोरी खपवून घेणार नाही. सत्ताधार्यांच्या चोरवाट्या आम्ही बंद केल्या आहेत. आम्ही हुकूमशाही खपवून घेणार नाही.