मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण…
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी माघार घेऊनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही.
त्यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या बिनविरोध न होण्याचे कारण सांगितले आहे.
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सहकार्य केलेलेच आहे. ज्यांनी बिनविरोधसाठी सहकार्य केले नाही, ते केवळ आपलं नावं माध्यमांमध्ये छापून आलं पाहिजे, थोडी प्रसिद्धी मिळाली पाहिजे, यासाठी ही मंडळी उभी आहेत. पण ठीक आहे.
महाराष्ट्र पोलिस सुनेत्रा पवारांची संपूर्ण काळजी घेईल
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संपूर्ण काळजी महाराष्ट्राचे पोलिस खाते घेईल. आपल्या पोलिसांनी यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे जे पत्र आले आहे, त्याची चौकशी करण्यात येईल. तसेच, योग्य सुरक्षाही त्यांना देण्यात आलेली आहेच, असे उत्तर फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याच्या प्रश्नावर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातील खानवडीतील शाळेचे उद्घाटन होणं, ही अतिशय चांगली बाब आहे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांसाठी शिक्षणाची चळवळ सुरू केली, त्याच विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्याचवेळी ज्या पद्धतीने छगन भुजबळ म्हणाले की, जोतिराव फुले हे महात्मा आहेत आणि देशात दोनच महात्मा आहेत. एक महात्मा गांधी आणि दुसरे महात्मा जोतिराव फुले. त्यामुळे कुठल्याही पुरस्कारपेक्षा महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्व मोठं आहे, असेही फडणवीस यांनी फुले यांच्या ‘भारतरत्न’बाबत भाष्य केले.
भुजबळांच्या हेलिकॉप्टर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीची घोषणा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये लॅड करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याप्रकारची माझ्याकडे माहिती नाही. पण त्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
