नितीशकुमारांनी तब्बल 20 वर्षांनी जड अंतःकरणाने सोडली खुर्ची…
अखेर नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मंगळवारी (14 एप्रिल) सकाळी 11 वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली भावनिक वातावरणात मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली.
यात मंत्रिमंडळ विसर्जीत करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर नितीशकुमार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने राज्यपाल लेफ्टनंट जनरल सैयद अता हसनैन (सेवानिवृत्त) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी लोकभवनकडे रवाना झाले.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल-भाजप युतीला दणदणीत बहुमत मिळाले. त्यानंतर सहा महिने ते मुख्यमंत्रीपदावर राहिले. नितीशकुमार यांना गत महिन्यात वयाची 75 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी त्यांनी आपल्याला राज्यसभेचा सदस्य होण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी राज्यसभा निवडणुकीत विजयही मिळवला. त्यांनी नुकतेच राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक केली असून त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी चार वाजता एनडीएच्या आमदारांची बैठक होईल. यात भाजपच्या बिहार विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाच्या निवड प्रक्रिया होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते.
नितीशकुमार यांनी सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री भूषवले. ते 3 मार्च 2000 रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने त्यांना अवघ्या 7 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. 25 नोव्हेंब 2005 रोजी मुख्यमंत्रीपदी त्यांचे पुनरागमन झाले. पण 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या मदतीने पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2015 पासून कधी राजदसोबत, कधी भाजपसोबत नितीशकुमार मुख्यमंत्रीपदावर कायम होते. मात्र आता राज्यसभा सदस्य होण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र सोडली आहेत. गत महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विजयही मिळवला. त्यांनी नुकतेच राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे.
