
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
जळगाव : राज्यात सध्या मशीदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण ढवळून निघालंय. यावरून राज्यातही दोन गट पडले आहे. भाजपसह एक गट हा राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते यावर सडकडून टीका करत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी तर हा राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा थेट आरोप केलाय. त्यामुळे आता पुन्हा यावर भाजप नेत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले आहे.
खडसे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. ओबीसींवर अन्याय करणारा आहे. मागच्या दाराने राजकीय आरक्षण घालवण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हणत त्यांनी भाजवर यावरून टीका केली. तसेच चंद्रकांत पाटील आज महाविकास आघडी सरकारवर हल्ला करत असतील, पण मागच्या काळात त्यांच्या वेळीही हा प्रश्न होताच की, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ओबीसींना आरक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज ओबीसींमध्ये संताप आहे. असेही ते म्हणाले.