
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लागोपाठ घेतलेल्या सभा, मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली ठाम भूमिका, हनुमान चालिसा लावण्याचे केलेले आवाहन आणि जाहीर केलेला अयोध्या दौरा या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांना धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली होती.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेटही घेतली होती. यानंतर आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतला आहे.
राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीवरूनही शिवसेनेने मनसेला टोला लगावला होता. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. अशा धमकीची शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. यानंतर मनसेने शिवसेनेवर पलटवार केला होता. मात्र, यानंतर आता ठाकरे सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.