
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद
अडीच-तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होण्याची पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रारूप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा हे आदेश प्राप्त झाले आहेत.
महापालिकेच्या तत्कालीन नगरसेवकांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपला आहे. मात्र सुरवातीला सर्वोच्च न्यायालयातील याचिका व नंतर कोरोना संसर्गामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या. कोरोना संसर्ग संपल्यानंतरही ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयांमुळे महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान महापालिकेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन वॉर्डाचा एक प्रभाग तयार करण्याचा निर्णय घेत प्रक्रिया राबविली होती. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या प्रक्रियेला स्थगिती दिली होती.
त्यामुळे निवडणुकीसंबंधी अनिश्चितता होती. असे असतानाच मंगळवारी रात्री उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे आदेश काढून लगतच्या जनगणनेच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या, रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार हे निश्चित झाले आहे.