
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे खास मर्जीतील सहकार क्षेत्रातील मुरब्बी राजकारणी व्यक्तीमत्व आणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गेल्या आठवड्यात 11 मे रोजी मूल येथे गोळीबार झाला होता. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारंवार जिल्हा पोलिस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.परंतू एक आठवडा लोटूनही हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत.
त्यामुळे आता पालकमंत्री श्री. मुनगंटीवारांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना लेखी पत्र देत हल्लेखोरांवर अटकेची कारवाई करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
रावत यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याची गंभीर दखल मुनगंटीवारांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला येत आहे.
मूल येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोरून दुचाकीने रावत जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते. गोळी झाडताच हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला जखम झाली होती.
या गोळीबारात श्री.रावत सुदैवाने थोडक्यात बचावले. या घटनेने राजकीय क्षेत्र हादरुन गेले आहे. दरम्यान मूल येथे या घटनेच्या निषेधार्थ सर्व राजकिय पक्ष व नागरिकांकडुन दुस-याच दिवशी स्वयंस्फुर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आरोपीच्या अटकेसाठी निदर्शनेही केली होती हे सर्वश्रृत आहे.
जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय
नेत्यावर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे. रावत यांचे कुणाशीही वैर नाही. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झडली गेली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.आठवडा उलटून गेला तरीही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. संतोष रावत यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा मास्टर माईंड शोधून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी लाऊन धरण्यात आली आहे.यासाठी मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. आरोपींना अटक करण्यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले होते. तरीही आरोपी अद्यापपर्यंत न मिळाल्याने आता परत एकदा पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी पोलिस अधीक्षकांना प्रत्यक्ष पत्र देऊनच हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व तसा सविस्तर अहवाल कळवावा असे त्यांनी पत्रात म्हटले असल्याचे समजते.