
शिरूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे ही राजकीय रिंगणात उतरले आहेत. शिरूर तालुक्यातील नागिरकांचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
शिरूर तालुक्यातील तब्बल २० ते २५ हजार सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लक्ष्मी घोडगंगा साखर कारखाना बंद पडण्याला आमदार अशोक पवार हेच जबाबदार असून, त्यांना उमेदवारी देऊन शेतकरी विरोधी भूमिका घेणारा पक्ष म्हणून प्रतिमा उभी करु नये, यासाठीच आपण स्वत: आणि पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नरके आम्ही दोघांनी शिरुर-हवेलीमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मुलाखती दिल्या आहेत, अशी माहिती माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी दिली.
शिरूरच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण गेली २५ वर्षे रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यावर अवलंबून असताना सन २००९ पर्यंत कारखान्याचे अध्यक्ष म्हणून आमदार अशोक पवार यांनी कारखाना उत्तम चालविला. मात्र, सन २००९पासून जसा त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या खासगी कारखान्याची उभारणी झाली, तशी ‘घोडगंगा’ची वाताहत होऊ लागली. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, ऊस दरात निच्चांकी, सामान्य सभासदांना सन्मान नाही, मृत सभासदांच्या वारसांची नोंद नसताना स्वतःच्या मुलाला संचालक करत अध्यक्ष केले. तसेच, मुलगा, पत्नी यांना राजकारणातील सन्मानाची पदे देताना कार्यकर्त्यांना काही द्यायचे ठरले की लगेच त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याच्या पद्धतीने माजी सभापती मोनिका हरगुडे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे, राजेंद्र जगदाळे आदींसारखी खुप मोठी फळी राजकारणाच्या वेगळ्या वाटेवर आली. त्यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आपली वाटचाल सुरू केली.
संपूर्ण पक्ष खासगी प्रॉपर्टी समजून हुकुमशाही पद्धतीने वागवून पुन्हा पक्षाकडून उमेदवारी मागण्याचे धाडस केलेल्या आमदार पवार यांना पुन्हा उमेदवारी देवू नये, अशी मागणी मुलाखतीवेळी जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे सर्व श्रेष्ठींपुढे मांडली. केवळ निष्ठावंत म्हणून अशोक पवार यांना उमेदवारी दिली जात असेल; तर आम्ही दोघेही गेली ४० वर्षे शरद पवार यांचे निष्ठावंत असून, सामान्य ऊस उत्पादकांसाठी पक्षश्रेष्ठी आम्हाला उमेदवारी नक्की देतील.