
ग्रामीण वारशाचे जतन तसेच नावीन्यपूर्णतेचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पति असलेल्या भीमथडी जत्रेने ग्रामीण-शहरी दरी कमी करण्याबरोबरच ग्रामीण समुदायांना विशेषतः महिला उद्योजकांना सक्षम करण्याचे काम केले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील सिंचननगर परिसरातील भीमथडी जत्रेला पवार यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी सुनंदा पवार उपस्थित होत्या.
महाराष्ट्राच्या ग्रामीण गावगाड्याचे आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारी, महिला व्यावसायिकांना चालना देणारी भीमथडी जत्रा 18 वर्षांपासून आयोजित केली जात आहे. यंदा 20 डिसेंबरपासून सुरू झालेली भीमथडी जत्रा 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून, राज्य आणि बाहेरून प्रतिसाद मिळत आहे.
देशपातळीवर भीमथडी जात आहे, याचा आनंद असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी भीमथडी यात्रेतूनच पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीला असून, त्याच्या उद्घाटनाला आपण उपस्थित राहावे, अशी सर्व साहित्यिकांची अपेक्षा आहे, असे सांगितले.
21 फेब्रुवारीला तीन दिवसीय साहित्य संमेलन दुपारी चार वाजता दिल्लीत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले. भीमथडी जत्रेच्या मुख्य आयोजिका सुनंदा पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शरद पवार यांच्या उपस्थितीने आमच्यात आणखी एक सकारात्मक शक्ती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण हृदयाचा उत्सव साजरा करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला बळ दिले आहे. त्यांच्या प्रोत्साहनाने आम्हाला या उपक्रमास आणखी एक पाऊल पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सुनंदा पवार यांनी स्पष्ट केले.
परभणीतील परिस्थितीची काळजीपूर्वक नोंद घ्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बीडमधील स्थिती अतिशय गंभीर आहे. मी त्या ठिकाणी जाऊन देशमुख कुटुंबीयांना भेटून आलो. तेथील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून स्थिती अतिशय गंभीर असून, काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे, असे सांगितल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले.