
नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढत आहेत. फलोदी सट्टा बाजारने देखील आपला अंदाज वर्तवला होता. मात्र आता फलोदी सट्टा बाजारने आपले दर बदलले आहेत. त्यामुळे भाजप, कॉँग्रेस की आप यापैकी कोणत्या पक्षाच्या अडचणीत वाढ होऊ शकते ते, जाणून घेऊयात.
दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे.
काय होता फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?
लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.
फलोदी सट्टा बाजारने बदलले दर
राजस्थानमधील फलोदी सट्टा बाजार हे आपल्या अचूक अंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. राजकीय समीकरणे आणि निवडणुकीचे परिणाम याबाबत भविष्यवाणी फलोदी सट्टा बाजार करत असते. हे केवळ अंदाज असतात. हे अंदाज खरे ठरतात की नाही हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नवीन अंदाजानुसार, आम आदमी पक्षाला नुकसान होताना पाहायला मिळत आहे. तर भाजप या निवडणुकीवर हळूहळू आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळत आहे. नवीन अंदाजानुसार आम आदमी पक्षाला 2 जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजपला फायदा?
भाजप या निवडणुकीत 31 ते 33 जागा जिंकण्याची शक्यता आहे. मात्र भाजप बहुमताचा आकडा पार करेल असे वाटत नाही. सध्या सुरू असलेला प्रचार आणि इतर गोष्टी यांमुळे भाजपला 2 जागांवर बढत मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिल्लीची सत्ता कोण काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉँग्रेसदेखील ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. मात्र मुख्य लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये होताना दिसून येत आहे.