
औरंगजेबाच्या कबरी’वरुन अजितदादांनी राणेंसह सगळ्यांचेच कान टोचले…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर नागपूरमध्ये हिंसाचारही झाला.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मंत्री नितेश राणे यांच्यासह हिंदूत्वादी पक्ष आणि महायुतीतील अनेकांनी कबर उघडून टाकण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात अजित पवार यांनी मात्र, आपली वेगळी भूमिका मांडली आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अनेक प्रकरणांमध्ये अजित पवार यांनी आपली वेगळी भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठकरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या काळात अनेक सरकार मुस्लिम होते. दारूगोळ्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती तो मुस्लिम मावळा होता. माझ्या मोबाईलमध्ये असे 15 ते 20 नावं आहेत. शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य केलं. शिवरायांनी सर्वांना सोबत घेतलं ही इतिगासात नोंद आहे, हे सर्वांना माहिती आहे. तेच नंतर शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अन्नाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या सर्वांनी सर्वांना सोबत घेऊन जातीय सलोखा ठेवून काम केलं. आज आपल्याकडे अनेक जातीधर्मांची लोक आहेत. कारण नसताना एकमेकांबद्दल द्वेष, दरी निर्माण करणं मला बरोबर वाटत नाही असं अजित पवार म्हणाले…
औरंगजेबाच्या कबरीवर बोलताना अजित पवार म्हणाले, कधीकाळी त्यांना तिथं दफन करण्यात आलं. त्याला किती वर्ष झाली. एवढ्या वर्षानंतर आताच कशाला उकरुन काढायचं. इतरांनीही योग्य पद्धतीनं वागलं पाहिजे, कुणी कायदा हातात घ्यायचं काम करु नये. सगळ्यांनी गुण्यागोविंदानं नांदावं. आपल्याकडे कायदा आहे, संविधान आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ही भूमिका मांडली आहे. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे नितेश राणे, भाजपचे नेते, शिवसेनेचे नेत्यांची मात्र गोची होईल असं चित्र आहे. तसंच अजित पवार यांच्या या वेगळ्या भूमिकेमागे जातीय, धार्मिक समीकरणं साधण्याचा हा महायुतीचा प्रयत्न आहे का? असाही सवाल उपस्थित होतोय.