
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कलवा येथे आयोजित केलेल्या “जनता दरबार”चा गाजावाजा केला जात असताना, दिव्यात मात्र मागील अकरा वर्षांत एकदाही जनता दरबार भरलेला नाही ही वस्तुस्थिती किती त्रासदायक आणि दु:खद आहे, हे आज प्रत्येक दिवेकराला प्रकर्षानं जाणवतंय.दिवा विभागातील जनता आजही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.हॉस्पिटल नाही,गार्डन नाही,तलाव मृत अवस्थेत,आणि पाण्याची टंचाई, अनधिकृत बांधकामे, कचऱ्याचा प्रश्न, वीज पुरवठा या समस्यांनी सामान्य जनतेचं जगणं असह्य केलं आहे.
अशा गंभीर पार्श्वभूमीवर, कलवा येथे ‘जनता दरबार’ घेऊन फोटोंमध्ये बुडालेलं लोकप्रतिनिधित्व हे दिवेकरांसाठी फक्त थट्टा वाटतेय. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी यावर संताप व्यक्त केला जनता दरबार कलवा, डोंबिवली,उल्हासनगर येथे केले जाते मग दिव्यातल्या जनतेचे प्रश्न खासदार कधी सोडवणार.खासदार साहेब, दरबाराचा लोकशाहीत सन्मान आहे, पण तो दरबार जर “जनतेसाठी” नसून “प्रचारासाठी” घेतला जात असेल, तर त्याचं रूपांतर केवळ नाट्यशैलीतील दिखाव्यात होतं. दिव्यातील नागरिक विचारतात दिवा शहर तुमच्या मतदारसंघातच आहे ना? मग इथं दरबार कधी होणार? की दिवा शहर तुमच्या नकाशातूनच गायब झालंय?
जनतेच्या मनात आता एकच सवाल आहे,
‘कामाचा दरबार कधी, की अजूनही फक्त फोटोच?’ अशी खरमरीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे