दैनिक चालु वार्ता वाघोली प्रतिनिधी – आलोक आगे
वाघोली परिसरात मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या पाससाठी अद्यापही स्थायिक, कायमस्वरूपी पास सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर वाघोलीमध्ये मयत पास देण्यासाठी चोवीस तास कायमस्वरूपी महापालिका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा अनिल सातव पाटील यांनी केली आहे.
वाघोलीसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या उपनगरामध्ये अंत्यविधीची प्रक्रिया सुलभ व सन्मानजनक व्हावी, यासाठी येथे स्थायिक मयत पास वितरण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती होणे गरजेचे आहे.
वाघोली गावचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर अनेक महिने मयत पास मिळवण्यासाठी खराडी, येरवडा येथे मयताच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत होती. मनपा वाघोली संपर्क कार्यालयात मयत पास उपलब्ध करून द्यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेकडून वाघोली येथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. परंतु २४ तास पास सुविधा उपलब्ध नसल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.
पावसाळा, रस्त्यांची दुर्दशा आणि वाहतूक कोंडी यामुळे रात्रीच्यावेळी आप्तस्वकीयाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या कुटुंबीयांना मयत पाससाठी धावपळ करावी लागत आहे.
प्रतिक्रिया :
एखाद्या व्यक्तीचा अपघाती, आजाराने किंवा नैसर्गीक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेचा मयत पास असणे बंधनकारक आहे. मयत पास स्मशानभूमीत दिल्यानंतरच पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातात. मनपा प्रशासनाने तातडीने मनपा वाघोली संपर्क कार्यालयात मयत पास वितरणासाठी चोवीस तास कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी तसेच पास देणाऱ्यांचे नाव व नंबर असल्याचे फलक लावावे. – अनिल सातव पाटील (माजी अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा हवेली तालुका)
प्रतिक्रिया :
सायंकाळी पाच ते सकाळी वाजेपर्यंत मयत पास देण्यासाठी मनपाकडून एक कर्मचारी कार्यरत आहे. तर सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत वाघोलीतील नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रातून पास दिली जाते. पास मिळत नसल्यास तक्रार करा. संबधितांवर कारवाई केली जाईल. २४ तास पास देण्याची सोय करण्यात आली आहे. – डॉ. रेखा लबडे-गलांडे (विभागीय वैद्यकीय अधिकारी, मनपा)