
मग देवेंद्र फडणवीस म्हणाले; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना…
मुंबई: पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे, म्हणजेच त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर, 5 जुलैला दोन्ही मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काढला जाणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
त्याऐवजी 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मोर्चा आणि जल्लोष करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैला विजयी मोर्चा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे, अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोमवारी नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात 5 जुलैच्या सभेत सामील व्हायचे की नाही, याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.
जीआर रद्द करत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्य सरकारने जीआर रद्द केल्यानंत मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला होता याची फडणवीसांनी आठवण करून दिली. डॉ. रघुनाथ माशेलकर समितीनं ठाकरेंना सोपवलेल्या अहवालातील शिफारशीच फडणवीसांनी वाचून दाखवल्या. उलट महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर बदलून हिंदी वैकल्पिप विषय केला असं फडणवीस म्हणाले. दरम्यान हिंदीवरून दोन्ही ठाकरेंनी हातात हात घालून रस्त्यावर उतरण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावा असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.
राज्य सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे काय म्हणाले?
हिंदीसाठी राज्य सरकारवर कुणाचा दबाव होता याचं गूढ अजूनही कायम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. राज्य सरकारने हिंदीबाबतचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली आहे.. मराठी माणसाच्या एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करायला राज ठाकरे विसरले नाहीत. दरम्यान सरकारनं हिंदीचे जीआर रद्द केल्यानंतर मनसेच्या नेत्यांनी शिवतीर्थकडे धाव घेत राज ठाकरेंचं अभिनंदन केलं.. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठिकठिकाणी जल्लोष सुरू आहे. राज ठाकरे आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका सविस्तर मांडणार आहेत.