
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सभागृहात भास्कर जाधवांनी धू – धू !
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी केलेल्या विधानांवर त्यांनी शाळादेखील घेतली.
तसेच, “शेतकरी आत्महत्या करतो, त्या शेतकरी वर्गाला कर्जमाफी कधी देणार? निवडणूक जवळ आल्यावर कर्जमाफी करणार का? लोकांना कोपराला गूळ लावण्याचे काम करणार आहे का? ठोस शब्द निर्णय घेतला पाहिजे, असे आमदार भास्कर जाधव विधानसभेत म्हणाले. तसेच यावेळी किमान 50 हजार तात्काळ मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “मे महिन्यात अवेळी पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 14 मे पासून रोजच पाऊस सुरू झाला. या पावसाने मोठी दाणादाण उडवली आहे. मराठवाड्यातील आणि विदर्भातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च पर्यंतच्या आहेत. वर्षभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना आश्वासने दिली होती. आम्ही सात बारा कोरा करू असे सांगण्यात आले. पण आता हे सरकार म्हणत आहे कर्जमाफी करू, पण योग्यवेळी करू. लाडक्या बहिणींना म्हणाले 2100 रुपये देणार, नाही दिले. हे आश्वासने फक्त निवडणुकीपुरते होते. अशी टीका त्यांनी केली.
हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून किमान 50000 रुपयांची तात्काळ मदत करण्याची गरज आहे. पंचनामे झालेले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत, पण त्या ठिकाणी नेटवर्कच नसेल तर काय करणार? शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने देखील पंचनामे केले जावेत, अशी माझी मागणी आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले जावे, सौरऊर्जा प्रकल्प मोफत देण्यात यावे, किती जणांकडे आहे सौरऊर्जा प्रकल्प? एक रुपयात पिकविमा ही योजना फसवी ठरली.” असे म्हणत हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. पुढे भास्कर जाधव म्हणाले की, “शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. कृषिमंत्री स्वतः टिंगल टवाळी करतात, कर्जमाफीच्या पैशातून काय मुली बाळांचे लग्न करायचे आहेत का? असे त्यांनी म्हटले होते. शेतकऱ्यांनी असे स्वप्न कधी बघू नये का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयांत पिकविमा दिला, असेही विधान कृषिमंत्र्यांनी केले होते. ती योजनाच रद्द झाली. तुमच्या काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? असेही ते म्हणाले. असे कोणी शेतकऱ्यांना म्हणू शकते का? पण हा सत्तेचा माज आहे. अशी टीका त्यांनी केली.