आमदार-खासदार साथ सोडणार; गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट…
मराठीच्या मुद्यावर एकत्रित आलेले उद्धव -राज ठाकरे यांनी आपण एकत्रित राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उद्धव-राज यांची युती मुंबई महापालिकेत भाजपला मोठी टक्कर देण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक नुकसान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे होणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, उत्साहावर पाणी फेरणारे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
गिरीश महाजन हे आषाढीनिमित्त पंढरपूरला आले होते. तेथे पत्रकारांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असून त्यांचे आमदार-खासदार हे आमच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये येण्यास ते उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
‘उद्धव ठाकरेंकडे कोणीच राहिलेले नाही. त्यांचेकडे जे आमदार-खासदार आहेत त्यांची बिचाऱ्यांची आमच्याकडे येण्यासाठी धडपड सुरू आहे. वारंवार आम्हाला भेटतायेत. त्यांचा विश्वास राहिलेला नाही. आजही त्यांचे खासदार आमच्या संपर्कात आहेत. ते स्वतः म्हणतायेत आम्हाला तिकडे राहायचे नाही. तिकडं काहीच नाही.’,असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
तिकडं फक्त बोलबच्चन आहे. बोलबच्चन अमिताभ बच्चन दुसरं त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही’, असा टोलाही उद्धव ठाकरेंना महाजन यांनी लगावला. दरम्यान, आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात असल्यादा महाजनांचा दावा आदित्य ठाकरेंनी फेटाळला आहे.ते म्हणाले, कालचे जे चित्र (ठाकरे बंधु एकत्र आले) होते. ते पाहून तिकडे सगळे हालले आहेत. त्यामुळे त्यांच्या एकाही विधानाला मी उत्तर देणार नाही.
एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंचे कौतुक
ठाकरे बंधु एकत्र येत असले तरी एकनाथ शिंदेंची शिवसेना अजुनही आशावादी आहे. राज ठाकरेंच्या विजयी मेळाव्यातील भाषणानंतर त्यांनी राज ठाकरेंचे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, राज यांचे भाषण हे मराठीसाठी होते. त्याच्यामध्ये संयम आणि मॅच्युरिटी दिसत होती. तर, दुसऱ्याचे भाषण हे खुर्चीसाठी, सत्तेसाठी होते.
