
सर्व आमदार माजलेत असं…
विधानभवनाच्या आवारात गुरूवारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात मोठी घोषणा केली. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीचे प्रकरण विशेषाधिकारी समितीकडे पाठविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
त्यानंतर पडळकर आणि आव्हाडांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी विधानसभेत पडळकर आणि आव्हाडांनी खेद व्यक्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार पडळकरांनीही दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आव्हाडांनी आपल्यासोबत नितीन देशमुख हा कार्यकर्ता आला नव्हता. घटना घडली त्यावेळी मी मरीन लाईन्समध्ये होतो. त्यामुळे या घटनेशी माझा संबंध नसल्याचे सांगत त्यांनी व्हॉट्स अप आलेल्या धमकीचा मुद्दा काढला.
आव्हाडांनी हा मुद्दा उपस्थित करताच नार्वेकरांनी त्यांना बोलण्यापासून रोखले. त्यावर ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आव्हाडांना बोलू द्यावे, अशी विनंती अध्यक्षांकडे केली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्यास उभे राहिले. धमकीचा उल्लेख करण्याला कुणाचीही ना नाही. विषय काय चालला आहे. अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत की नाही, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस बोलत असतानाच विरोधी बाकांवर असलेल्या जयंत पाटील यांच्याकडून काही भाष्य करण्यात आले. त्यानंतर मात्र फडणवीसांचा पारा चढला. जयंतराव, आपण फार सिनिअर आहात. ही प्रतिष्ठा काय, कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे बोलताना ते म्हणाले, आज ह्या ज्या काही शिव्या बाहेर पडतायेत, त्या काही एकट्या पडळकरला किंवा ह्यांच्या माणसाला पडत नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या नावाने बोललं जातंय की, हे आमदार माजलेत म्हणून. जरा गांभीर्यानं घ्या. प्रत्येक गोष्ट अशी राजकीय करून आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत, जयंतराव. हे बरोबर नाही. अशाप्रकारे समर्थन करणे योग्य नाही.