
राऊत म्हणाले उचलबांगडी फिक्स; योगेश कदम म्हणतात तुमचा…
चिपळूण : पावसाळी अधिवेशनानंतर महायुतीच्या सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना वगळले जाईल अशा चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या संदर्भात विधान करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची उचलबांगडी होणार असल्याची टीका केली होती.
यावर खुद्द योगेश कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांनी ‘सामना’ वाचायचं सोडून दिलं आहे. इतकंच नाही तर ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिकही आता सामना घेत नाहीत. सामना जर का हे सरकार चालवायला लागलं, तर मग कठीण होऊन जाईल अशा बातम्यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशी उपहासात्मक टीका त्यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, रविवारी खेड दौऱ्यावर येत आहेत. अशातच शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम मतदारसंघात ठेवण्यात आले आहेत. या सगळ्याला योगेश कदम व त्यांच्या पत्नी श्रेया कदम उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करणार असल्याने त्याची तयारी सध्या योगेश कदम यांच्याकडून सुरू आहे. यावेळी त्यांनी माध्यमांजवळ संवाद साधला.
माजी खासदार विनायक राऊत यांनी मंत्री उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा घेत आहेत, ते त्यांना पॅरलल होऊ लागले आहेत, या केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना सत्तेच्या बाहेर बसवलेलं आहे ते सत्तेच्या बाहेर राहून चर्चेत राहण्यासाठी अशी वायफळ वक्तव्यं करत आहेत. त्यांना आम्ही किंमत देत नाही अशी वक्तव्य करून आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही.
उदय सामंत व आम्ही सगळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. बाळासाहेबांचे विचार आम्ही प्रखरपणे पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे टीका करणे इतकेच काम आता विरोधकांना राहिले आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सावली डान्सबारबाबत केलेल्या आरोपांच्या प्रश्नावर विचारलं असता योगेश कदम म्हणाले की, याबद्दल मी आधीही बोललो आहे, याबाबत मुख्यमंत्री महोदय योग्य निर्णय घेतील. अनिल परब यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, योग्यवेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ अस एका वाक्यात त्यांनी उत्तर देत त्यांनी विषय संपवला.
कोकणातील खेड येथील गेली सोळा वर्षे नादुरुस्त असलेलं मीनाताई ठाकरे नाट्यगृह रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांसाठी खुले होत आहे. याबद्दल योगेश कदम यांनी समाधान व्यक्त केल आहे. आदरणीय माँ साहेब ठाकरे यांच्या नावाने असलेलं हे कोकणातलं सगळ्यात टॉपचे नाट्यगृह असेल आणि आम्ही ते सुरू करू शकलो याचा आम्हा सगळ्या शिवसैनिकांना आनंद आहे.
रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन हे कोकणातलं पहिल माँ साहेबांच्या नावाने नाट्यगृह सुरू केलं होतं. ते गेली काही वर्षे नादुरुस्त झालं होत. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा या नाट्यगृहाच्या कामाला गती मिळाली आणि आता ते सुरु होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. रसिक प्रेक्षकांनाही याची उत्सुकता असून लवकरच हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले होईल अशी माहिती कदम यांनी दिली.