
बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानं भाजपच हरली; अंधारेंचा दावा !
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधले होते. कारण या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र आले होते.
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा मोठा पराभव झाला.
यावरुन भाजपनं ठाकरे बंधुंना टार्गेट करत ठाकरे ब्रँड अपयशी ठरल्याचं म्हटलं होतं. पण आता ठाकरेंच्या मदतीला त्यांच्या उपनेत्या सुषमा आंधारे आल्या आहेत. आमचा नाहीतर तुमचाच पराभव झाला असं सांगताना ही निवडणूक मतपत्रिकांवर झाल्यानं भाजपचा यात पराभव झाला असा दावा त्यांनी केला आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्यावतीनं पहिल्यांदाच या निवडणुकीवर भूमिका मांडली. अंधारे म्हणाल्या, “ही कुठल्याही निवडणुकीची रंगीत तालीम नव्हती, ही बातमी माध्यमांची आहे. माध्यमाने याला सेमी फायनल वगैरे म्हणायला सुरुवात केली आहे. ९ वर्षाच्या सत्तेनंतर या निवडणुकीत बदल झाला आहे.त्यामुळे लोकांना कूस बदलावीशी वाटली असेल. मात्र, दुसऱ्या अंगाने पाहिलं तर भाजपची दिल्लीपासून सगळीकडे सत्ता आहे, तरीही भाजप बेस्ट निवडणुकीत हारलं आहे.
बेस्ट निवडणुकीत भाजपा सपशेल तोंडघशी पडली आहे. पराभव त्यांचा देखील झाला आहे. बॅलेट पेपरवर जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या त्यावेळी भाजप हारली आहे. कालच्या निवडणुकीत भाजपा अपयशी ठरली आहे. शशांक राव यांच्या आघाडीला जिंकल्यानंतर ते आपलेच आहेत, असं भाजप म्हणत दुसऱ्याची पोर अंग खांद्यावर खेळवली म्हणजे ती भाजप आपलीच पोरं म्हणत आहे. महानगरपालिका निवडणुका अजून लांब आहेत. एखाद्या पराभवानंतर भूमिका बदलाव्यात ठाकरे इतके तकलादू नाहीत. ठाकरे ज्या भूमिका घेतात म्हणजे कणखरपणे घेतात. ठाकरेंचा हाच कणखर बाणा भविष्यात कायम राहील असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बेस्टच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची झालेल्या भेटीवरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या. “दोघांची भेट ही सहज आणि स्वाभाविक गोष्ट आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कोणतेही नेते मुख्यमंत्र्यांना कधीही भेटू शकतात, याचे वेगळी अर्थ लावायचे काही कारण नाही. त्यापेक्षा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुंबईची अवस्था बिकट झाली आहे.
बेस्टच्या विषयाबद्दल बोलणाऱ्यांनी बेस्ट काल पाण्यात बुडवून दाखवली आहे. विमानतळावर इतकं पाणी साठलं होतं की त्या ठिकाणी बोटी चालवाव्यात का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नगरविकास खात्याला शालजोडातून मारून राज्यात कुंपणच शेत खात आहे, अशी आपल्या राज्याची अवस्था झाली असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला करून दिली, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.