
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडलेले आहे. कारण अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे. या करामुळे भारतातील कापड आणि इतर काही क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे सुरत, नोएडा आणि तिरुपूर येथील काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे.
यामुळे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात 70 % ने कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे 55 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मात्र दुसरीकडे अमेरिकेचीही चिंता वाढली आहे. कारण अमेरिकेत मागणी असलेल्या काही वस्तू फक्त भारतातच तयार होतात. त्यामुळे या वस्तू भारताकडून खरेदी करण्याशिवाय अमेरिकेसमोर दुसरा पर्याय नाही. तसेच जर अमेरिका या वस्तू भारताव्यतिरिक्त इतर देशांकडून खरेदी करत असेल, तर त्यांना त्या वस्तू आयात करण्यासाठी जास्त खर्च होणार आहे. तसेच इतर कोणताही देश अमेरिकेच्या गरजेनुसार या वस्तू अमेरिकेला पुरवू शकत नाही.
या कारणामुळे अमेरिकेने या वस्तूंवर कोणताही कर लावलेला नाही. तसेच यातील काही वस्तूंवर फक्त 25 टक्के कर असणार आहे. त्यामुळे या वस्तू अजूनही पूर्वीप्रमाणेच अमेरिकेला निर्यात केल्या जात आहेत. या कराचा कोणताही परिणाम या वस्तूंच्या व्यापारावर झालेला नाही. मात्र आता भारत या वस्तूंवर निर्यात कर लावण्याचा निर्णय घेऊ शकतो.
या कोणत्या वस्तू आहेत?
भारतातील फार्मा क्षेत्र (औषधे आणि उपकरणे), इलेक्ट्रॉनिक्स (स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने), ऊर्जा आणि पेट्रोलियम पदार्थ या वस्तूंची अमेरिकेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या उत्पादनांवर कर लावलेला नाही. तसेच काही वस्तूंवर 25 टक्के कर आहे, यात लोह-शिसे, अॅल्युमिनियम, तांबे आणि त्यापासून बनलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.
औषधांवर कर का नाही?
भारतातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधे अमेरिकेले पुरवली जातात. अमेरिकन आरोग्य व्यवस्था स्वस्त भारतीय औषधांवर अवलंबून आहे. जर या औषधांवर 50 टक्के टॅरिफ लावला तर औषधे महाग होतील, ज्यामुळे अमेरिकेतील जनता रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स
अमेरिकन बाजारपेठेतील अॅपल, सॅमसंग आणि इतर कंपन्यांच्या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या बऱ्यांच कंपन्या भारतात स्थलांतरित झालेल्या आहेत. कंपन्यांनी भारतात आपले उत्पादन वाढवले आहे. जर या गोष्टींवर टॅरिफ लावला गेला तर अमेरिकन नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होतील. तसेच विक्रीवरही परिणाम होईल त्यामुळे या क्षेत्रावर कर लावलेला नाही.