
अंगावर काटा येणारं दृश्य !
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारा रस्ता खचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला आहे. रस्त्याचा भाग थेट खाली नाल्यात पडला आहे.
या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. सुदैवाने रस्ता खचला तेव्हा कुठलीही गाडी तिथून जात नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होता. विशेष म्हणजे या रस्त्यावर तब्बल 20 फुटांचा खड्डा पडला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तसेच सध्या पाऊसही पडत नाहीय. तरिही रस्ता खचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रस्त्याचं काम निकृष्ठ दर्जाचं होतं का? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. संबंधित घटना ही शिवडी येथे BPT रोडवर घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून हा खड्डा पडला आहे. पण प्रशासनाने याकडे चार दिवसांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
शिवडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला आहे. या रस्त्यावर तब्बल 20 फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्ड्याशेजारी आता पोलिसांकडून बॅरिकेंटींग करण्यात आलं आहे. या घटनेनंतर स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी प्रशासनालाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून इथे बॅरिकेट्स लावण्यात आले. सध्या हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
या ठिकाणी नवीन ड्रेन बांधण्याचं अश्वासन मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. तोपर्यंत या ठिकाणी वाहतुकीसाठी वाहतूक विभाग दोन माणसं आणि मुंबई पोर्ट दोन माणसं आणि पोलीस या ठिकाणी असतील. जेणेकरुन हा रोड बंद असल्याने बाजूच्या रोडने सुरळीत वाहतूक होईल. यामुळे अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कोणताही त्रास होणार नाही”, अशी प्रतिक्रिया स्थानिक शिवसेना नेत्याने दिली आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई पासून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवर हा खड्डा पडलेला आहे. गेल्या चार दिवसांपासून ही मार्गीका बंद केलेली आहे. हा रस्ता महानगरपालिकेच्या नसून बी पी टी प्रशासनाच्या अखत्यारीतला आहे असं सांगण्यात येतं आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी यंत्रणांना बोलावलं
स्थानिक शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी संबंधित घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्याकडून आज संबंधित ठिकाणी मुंबई मनपा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए, शिवडी पोलीस ठाणे, वडाळा वाहतूक विभाग पोलीस अधिकारी या सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी बोलून वस्तुस्थिती लक्षात आणून देण्यात आली. तसेच यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी या प्रसंगी केली.
या खड्ड्यांमुळे शिवडीकडे जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिक जामवर नियंत्रण ठेवण्यासाठी वडाळा वाहतूक विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच मुंबई मनपाने या ढासळलेल्या नाल्यावरील भाग पुन्हा बांधून घ्यावा, तसेच सदर खड्ड्यातून नाल्यात पडलेला स्लॅब काढून घेण्यात यावा. जेणेकरून पावसाळी पाण्याचा निचरा थांबणार नाही, अशा देखील मागण्या करण्यात आल्या. यावेळी शाखाप्रमुख बैजू हिंदोळे शिवसेना शाखा क्रमांक २०६ चे शिवडी पूर्व विभागातील पदाधिकारी, स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.
अशी घटना कशी घडू शकते?
दरम्यान, मुंबईत दरवर्षी प्रचंड पाऊस पडतो. या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडणं, किंवा जीर्ण झालेल्या इमारतींचा काही भाग कोसळून नुकसान झाल्याच्या घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात. त्यामुळे पावसाचा योग्य अंदाज घेऊन रस्त्यांचं बांधकाम करणं अपेक्षित असतं. राज्य सरकारकडून सध्या रस्त्यांची कनेक्टिवीटी वाढवली जात आहे. वाहतूक आणि दळवळणची सुविधा आणखी सुरळीत व्हावी यासाठी सरकारकडून नवे रस्ते बनवले जात आहेत. मोठमोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं जाळं आखलं जात आहे. मुंबईत तर भुयीरी मेट्रोदेखील सुरु आहेत. तसेच रस्त्यांचं जोरात काम सुरु आहेत.
विशेष म्हणजे मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारा अटल सेतू हा सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प होता. तो पूर्ण झालाय. या मार्गाचं उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांच्या हस्ते या पूलाचं उद्घाटन झालं होतं. अटल सेतू जवळपास 22 किमीचा आहे. समुद्रावरचा हा सर्वात मोठा पूल आहे. या पुलाचा जवळपास 16.5 किमी भाग हा समुद्रात आहे. तर उर्वरित भाग जमिनीवर आहे. तसेच या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर आलं आहे. पण या पुलावरुन जाण्यापूर्वी शिवडी या ठिकाणी रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.