पुण्यातील व्हिडीओ व्हायरल; दीड तास लोक पावसात होते भिजत…
पुण्यात नवले ब्रिज परिसरात राजकीय नेत्यांच्या ताफ्यामुळे वाहतूक दीड तास ठप्प झाली. मुसळधार पावसात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पुण्यातलं ट्रॅफिक हे जगजाहीर आहे, आणि त्यात जर पाऊसही असेल, तर मग विचारायलाच नको. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून गाडी चालवताना चालकांचा अक्षरशः घाम निघतो. पण या परिस्थितीसाठी अनेकदा पुणेकरांनाच जबाबदार धरलं जातं. कारण चालक बेशिस्तपणे गाडी चालवतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मात्र प्रत्येक वेळी वाहतूक कोंडीसाठी स्थानिक लोकच जबाबदार असतात असं नाही. काही वेळा राजकीय नेत्यांच्या व्हीआयपी संस्कृतीमुळे देखील कोंडीचा सामना करावा लागतो.
अशाच एका प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात लोक मुसळधार पावसातही पाऊण तासाहून अधिक वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलेले दिसत आहेत. कारण त्या मार्गावरून राजकीय नेते प्रवास करणार होते. या घटनेचा व्हिडिओ एका पुणेकराने शेअर केला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
(फोटो सौजन्य – punekarnews/Instagram)राजकीय नेत्यांसाठी ट्रॅफिक जॅम
हा व्हिडिओ punekarnews या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला ट्रॅफिक जॅमबद्दल संताप व्यक्त करताना पाहता येतं.
नवले ब्रिज परिसरात राजकीय नेत्यांचा ताफा जाणार असल्याने त्या भागातील सर्व वाहने थांबवण्यात आली होती. परिणामी नवले ब्रिजखाली वाहतूक कोंडी निर्माण झाली. एकीकडे मुसळधार पाऊस आणि त्यात ट्रॅफिक जॅम या दोन्ही गोष्टींमुळे लोकं प्रचंड वैतागली होती. व्हिडिओतील व्यक्तीच्या मते, जवळपास दीड तास पोलिसांनी वाहतूक रोखून ठेवली होती. त्यामुळे नागरिकांचा पारा चढला आणि त्यांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली.
एका राजकीय नेत्यासाठी शेकडो लोकांना वेठीस धरणं योग्य आहे का? असा सवाल नेटकरी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत.
(फोटो सौजन्य – punekarnews/Instagram)


