केंद्र सरकार निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या न्याय सत्याग्रह आंदोलनात ते बोलत होते.
सपकाळ यांनी आरोप केला की, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळत नाही.
भाजपच्या राजवटीत शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट आणि तिप्पट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ना खाऊंगा, ना खाने दूंगा ही घोषणा पोकळ ठरली आहे, कारण गेल्या १२ वर्षांपासून देशात पद्धतशीरपणे चाललेली लूट जनतेला पाहायला मिळत आहे.
केंद्राने दबावाखाली येऊन अमेरिकेसोबत एक व्यापारी करार केला, ज्याचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना मोदी घाबरतात. या करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
तरुण, कामगार, मजूर आणि शेतकरी यांची फसवणूक करण्यात आली आहे.तसेच, २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की, त्या हल्ल्यात वापरल्या गेलेल्या ३०० किलो आरडीएक्स चा स्रोत अद्यापही शोधला गेलेला नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जेव्हा भारतीय लष्कर जोरदार कामगिरी करत होते, तेव्हा ट्रम्प यांच्या एका फोन कॉलमुळे नरेंद्र मोदी यांनी माघार घेतली. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले होते, ज्याचा परिणाम म्हणून शिमला करार झाला. मात्र, सध्याच्या नेतृत्वाने देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधान, लोकशाही आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी लढा देत आहेत, असे सपकाळ यांनी म्हटले.
