SCO मध्ये भारताने स्पष्ट केली भूमिका; राजनाथ सिंह यांचे नव्या जागतिक व्यवस्थेवर मोठे विधान !
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) बैठकीत जागतिक सुरक्षा, दहशतवाद आणि सहकार्य यावर भारताची स्पष्ट भूमिका मांडली. सध्याच्या विखंडित जागतिक वातावरणात एससीओची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे आणि जगाने एकत्र येऊन दहशतवादाविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह म्हणाले की, एससीओ प्रदेश हा जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आणि सामायिक सांस्कृतिक वारशाचे केंद्र राहिला आहे. हा प्रदेश ऐतिहासिक व्यापारी मार्ग, उद्योजकता आणि सांस्कृतिक संबंधांनी समृद्ध आहे.
ते म्हणाले की, आज जगात एकतर्फीपणा आणि संघर्ष झपाट्याने वाढत आहेत. जागतिक एकमत कमकुवत होत आहे आणि मतभेद अधिक ठळक झाले आहेत. अलिकडच्या वर्षांत, वारंवार होणाऱ्या युद्धांमुळे आणि संघर्षांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे.
संरक्षण मंत्री म्हणाले की, संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणेसाठी आत्मपरीक्षणाची ही वेळ आहे. दहशतवाद, अतिरेकीपणा आणि कट्टरतावाद हे आज सर्वात मोठे जागतिक धोके बनले आहेत.
दहशतवादावर कठोर भूमिका…
ते म्हणाले की, एससीओने (SCO) दहशतवादाविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे आणि तियानजिन जाहीरनाम्याने या दिशेने एकजूट अधिक दृढ केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, या हल्ल्याने संपूर्ण मानवतेला हादरवून सोडले आणि हे सिद्ध केले की दहशतवादाचे कोणतेही समर्थन नाही.
ऑपरेशन सिंदूर आणि शून्य सहनशीलता धोरण
राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या “शून्य सहनशीलता” धोरणाचे प्रतीक आहे.” त्यांनी यावर जोर दिला की, दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो आणि त्याकडे एक जागतिक धोका म्हणून पाहिले पाहिजे. ते म्हणाले की, “राज्य-पुरस्कृत आणि सीमापार दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. दुटप्पीपणाला जागा नसावी आणि सर्व देशांनी एकसंध दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.
RATS ची महत्त्वपूर्ण भूमिका :
राजनाथ सिंह यांनी एससीओच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचनेची (RATS) भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की कट्टरतावाद, फुटीरतावाद आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी एक संयुक्त आघाडी आवश्यक आहे. ते म्हणाले की, “प्रश्न ‘नवीन जागतिक व्यवस्था’ निर्माण करण्याचा नाही, तर ‘अधिक सुव्यवस्थित जग’ निर्माण करण्याचा आहे. हे साध्य करण्यासाठी युद्ध आणि हिंसाचार नव्हे, तर संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी राजनाथ सिंह म्हणाले की, केवळ ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर आधारित सहकार्यानेच जगात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित केले जाऊ शकते.
