
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर ‘सामना’तून एकनाथ शिंदेंना चॅलेंज !
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत?
लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मात्र, आता त्याच छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे. ते आता भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार का, असा सवाल ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात भुजबळांची ‘मांडी’ नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने फक्त भुजबळांची नव्हे, तर इतर अनेकांची शोकांतिका झाली. फडणवीस, एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल. शिंदे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
भुजबळ यांच्या शपथविधी सोहळय़ाला शिंदे-मिंधे यांनी हजेरी तर लावलीच शिवाय शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा शिंदे व त्यांच्या लोकांना इशारा आहे. छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यासंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता. अजित पवार यांनादेखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती. भुजबळ व अजित पवार यांची जागा तुरुंगातच आहे व अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री ठाकरे बसतात यास काय म्हणावे? त्यामुळे ठाकऱ्यांचे सरकार आम्ही खेचणार व भुजबळ, अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार, असे फडणवीस रोज बोलत होते. भुजबळ निर्दोष मुक्त झालेले नाहीत, फक्त जामिनावर सुटले आहेत याचाही उल्लेख फडणवीस जाणीवपूर्वक करीत असत. मात्र आज चित्र असे आहे की, भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांडयांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना ‘देवेंद्ररतन’ तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करीत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
भुजबळ हे अजित पवार अन् फडणवीसांचा नव्हे तर अमित शाहांचा आदेश पाळतील: सामना
एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला तुरुंगात पाठवायचे, त्याच्या मांडीला मांडी लावून कधीच बसणार नाही, असे बोंबलायचे. नंतर मात्र सत्तेसाठी त्यांनाच पक्षात घेऊन लोकांना मूर्ख बनवायचे हा भाजपचा धंदा आहे. भुजबळ यांच्यावर ईडीने व किरीट सोमय्यासारख्या भुक्कड लोकांनी आरोप केले. अर्थात किरीट सोमय्याला असे आरोप करून भुजबळांचा छळ करण्याची प्रेरणा फडणवीस वगैरे लोकांचीच होती. आता हाच भुक्कड किरीट सोमय्या भुजबळांच्या मांडीवर थाप मारताना दिसेल. मिंधे गटातील गुलाब पाटील, नांदगावचे कांदे यांनी तर भुजबळांविरुद्ध मोहीमच उघडली होती. भुजबळ हे आसाराम असल्याचे गुलाब पाटील जाहीर सभेतून बोलत होते. आता मंत्रिमंडळात याच आसारामांच्या पादुकांचे पूजन मिंधे वगैरे लोकांना करावे लागेल. भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद अनेक वर्षे भूषवले आहे. त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. फडणवीस त्यांचे सध्याचे पंठमणी आहेत. यापुढे भुजबळ हे अजित पवारांचे नव्हे, तर फडणवीस यांचे आदेश पाळतील व त्यांचे नेते अमित शहाच असतील, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.