
सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान !
आज गरज आहे ती समाजातील जातीभेद बाजूला सारून उभे राहण्याची आणि एक समरस आणि सर्वसमावेश राष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नागरिक घडवण्याचे आहे.
आणि नागरिक घडवण्याच्या माध्यमातूनच कुटुंब, समाज, देश आणि अंतिमतः संपू्र्ण मानवतेबद्दलच्या उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते’, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले.
दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांच्या भागात असलेल्या शाखांबद्दल आणि कामाबद्दलची माहिती घेतली.
मोहन भागवत म्हणाले, “शाखा असलेल्या भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत संघ गेला पाहिजे. आपण म्हणतो की, वसुधैव कुटुंबकम… विश्वच एक कुटुंब आहे. हीच भावना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याचा विस्तार समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात केला आहे.”
पंच परिवर्तन सूत्र घेऊन संघ करतोय काम
“देशभरात लाखो सेवा कार्य स्वयंसेवक आणि समाजाच्या सहकार्याने सुरू आहेत. या कार्यातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन केले जात आहे. सध्या संघाने शताब्दी वर्षात पाऊल ठेवले आहे आणि पंच परिवर्तन हे सूत्र घेऊन काम करत आहे. समाजाला जागरूक, उत्तरदायी आणि संवेदनशील बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे”, असेही मोहन भागवत म्हणाले.
मंदिर असो वा स्मशानभूमी, त्यावर सगळ्याचा समान अधिकार हवा
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, समाज असा असावा की, त्याला देशाबद्दलच्या जबाबदारी जाणीव असायला हवी. पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारा आणि जातीभेदातून मुक्त व्हा. मंदिर, पाण्याची ठिकाणे, स्मशानभूमी या सारख्या सार्वजनिक संसाधनांवर पूर्ण समाजाला समान अधिकार हवा. तीच खरी सामाजिक समरसता आहे, अशी भूमिका भागवत यांनी मांडली