
ते येतो म्हटले; मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा !
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण फोनवरून अंतरवली सराटीला येण्याचं निमंत्रण दिल असून त्यावर ते येतो म्हणाल्याचा खुलासा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आंदोलनापूर्वी काल (29 जून) जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. दुपारी बारा वाजताच्या या बैठकीला राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. अशातच, 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलनावरती मनोज जरांगे हे ठाम असून काल बोलवलेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये 27 ऑगस्टलाच आपण मुंबईसाठी अंतरवलीमधून निघणार असून 29 ऑगस्टला आझाद मैदानावरती धडकणार असल्याचा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिलाय, दरम्यान 29 ऑगस्ट नंतर आपण कोणाचेही ऐकणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
मनोज जरांगे यांचा बोलवता धनी शरद पवारच- लक्ष्मण हाके
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आरपार लढाईचा एल्गार पुकारलेला असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या आंदोलनामागे शरदचंद्र पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हेच असल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी सत्ता हातातून जाते तेव्हा वेगवेगळ्या कुटील कारस्थानाने महाराष्ट्र अस्थिर करायचा ही शरद पवार यांची खेळी असल्याची टीका हाके यांनी केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्र देणे असो किंवा आंदोलनाला सर्व प्रकारची रसद पुरवणे असो, यामागे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याचे हाके यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांचे काही साथीदार हद्दपार झालेत, काहींना अटक झालेली आहे. अशा परिस्थितीत सरकारवर दबाव आणण्यासाठी हा आंदोलनाचा फास असल्याचा आरोपही हाके यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण ही लोकशाहीच्या आणि घटनेच्या चौकटीतच बसून मिळू शकते, आम्ही आंदोलन करून झुंडशाही करून ते मिळवू. असे कोण सांगत असेल तर त्याला मराठा समाजाने बळी पडू नये, असे आवाहन ही हाके यांनी केले आहे. यामुळे मराठा समाजाने कोणाच्या भुलथापांना बळी पडू नका, बेकायदा मागण्यांना बळी पडू नका, शरद पवारांच्या कुटील कारस्थानांना बळी पडू नका, अन्यथा पुन्हा महाराष्ट्रातील वातावरण कलुशीत होईल, असे आवाहन हाके यांनी मराठा समाजाला केले. या आंदोलनामुळे राज्यातील सामाजिक परिस्थिती पुन्हा चिघळेल राज्य सरकार अस्थिर होईल आणि पुन्हा आपण सत्तेत कसे पोहोचू एवढा एकमेव उद्देश या आंदोलना मागे असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.