
वाचा आतापर्यंतचा प्रवास…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते 29 ऑगस्टपासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. अंतरवाली सराटीतून जरांगे पाटलांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी सतत लढा देणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जरांगे पाटील कोण आहेत?
मनोज जरांगे हे मूळचे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र सुमारे 20 वर्षांपूर्वी दुष्काळामुळे त्यांचे वडील जालना जिल्ह्यात स्थायिक झाले होते. मनोज जरांगे हे 4 भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलने करत आहेत. बारावीत असताना त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर ते आरक्षणाच्या चळवळीत सामील झाले. उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्येही काम केले होते. मनोज जरांगे यांनी आतापर्यंत 30 पेक्षा अधिक वेळा आंदोलन केले आहे. 2016 ते 2018 पर्यंत त्यांनी जालन्यात आरक्षण चळवळीचे नेतृत्वही केले होते.
काँग्रेसमध्येही केले होते काम
मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीला काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते काही काळ जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र वैचारिक मतभेद असल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते राजकारणातून बाहेर पडले. कालांतराने त्यांनी मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवबा संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम केले.
2 एकर जमीन विकली
मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्यांच्याकडे संघटना चालवण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी आपली जमीन विकली होती अशीही माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये जालन्यातील पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी तीन महिने आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर 2023 मध्येही त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत. यावेळीही त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या समोर सरकार झुकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.