
गेही दिवसांपूर्वी पुण्यात आयुष कोमकर नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती, बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर आयुषच्या हत्येचा आरोप आहे, या प्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील काही जणांना पोलीसांनी अटक केली आहे, आयुष कोमकर खून प्रकणात आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती, वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकर याने आपलाच नातू असलेल्या आयुष कोमकर याची हत्या घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान पोलीस चौकशी सुरू असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये आंदेकर टोळीने पुण्यातून तब्बल वीस कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे. गणेश पेठ येथील मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटी हून अधिक रकमेची खंडणी उकळल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. व्यापाऱ्यामध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज आंदेकर या सर्वांनी मिळून दर महिन्याला 15 ते 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे. आयुष कोमकर खून प्रकणात आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, त्याचा तपास सुरू असतानाच चौकशीदरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे
अवैध बांधकामांवर हातोडा
दरम्यान दुसरीकडे आज पुणे पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकानं मोठी कारवाई केली आहे, पुण्याच्या नाना पेठ येथे असलेल्या बंडू आंदेकरच्या अवैध बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बंडू आंदेकर याचं अवैध बांधकाम पाडण्यात आलं आहे, तसेच आंदेकर टोळीचे सर्व फ्लेक्स देखील हटवण्यात आले आहेत. त्यापूर्वी आंदेकरच्या संपत्तीचा शोध घेत असताना त्याचे 27 बँक खाती आढळून आली होती, ती सर्व बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत, या बँक खात्यातून मोठा व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.