
सातारच्या पांडे गावातील उभ्याच्या नवरात्रीची अनोखी परंपरा !
सध्या देशभरात शारदीय नवरात्रौत्सव सुरू आहे. घरोघरी घटस्थापना करीत देवीची पूजा केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात आली आहे.
नऊ दिवस अनेक भक्त उपवास करतात. उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काहीजण नऊ दिवस उपवास करतात मात्र एक वेळ जेवतात. तर काही जण केवळ उपवासाचं खाऊन नऊ दिवस उपवास करतात. जे नवरात्रीचा कडक उपवास करतात ते चप्पलही वापरत नाहीत. ज्याला जसं जमेल तशी देवीची पूजा-अर्चा केली जाते.
साताऱ्यात नवरात्रौत्सवातील अनोखी प्रथा समोर आली आहे. याला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं. या भक्तांची इतकी श्रद्धा इतकी विलक्षण आहे की ऐकल्यावर नवलच वाटेल. साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील पांडे गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला भक्त एक अनोखी उपासना करतात. ही परंपरा साधारण साडे तिनशे वर्ष जुनी आहे. येथे काळभैरवाचं जागृत स्थान आहे. येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.
पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी या गावातील 350 ते 400 लोक उपवास करतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. आणि नवसासाठी हा कडक उपवास केला जातो. विशेष म्हणजे गावातील मुस्लीम समाजातील लोकही देवीचा हा कडक उपवास करतात. आजही येथील हिंदू-मुस्लीम समाज एकत्रितपणे आनंदात नांदतो.
उपासक या पाळण्यावर छाती टेकवून आणि एक पाय वर घेऊन उभ्या उभ्या झोपतात
उपवासाला तेल, मीठ, तिखट पूर्ण त्याग
पांडे गावातील हे उपासक नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस कडक उपवास करतात. तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग केला जातो. हे नऊ दिवस ते केवळ गोड खातात. यामध्ये साबुदाण्याची खिर खाल्ली जाते. याशिवाय ते फळं आणि दूध घेतात.
9 दिवस उभं राहतात…
हा उपवास इतका कडक असतो की या नऊ दिवसांच्या काळात ते बसत नाहीत. ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या नऊ दिवसास ते झोपत नाहीत. पळत नाही. चप्पल घालत नाही. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते. पहाटे पाच वाजता उठून नैसर्गिक विधी उभ्यानेच केला जातो. झोपाळ्यावर छाती टेकून एक पाय वर घेऊन झोपतात. या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो.
मुस्लीम उपासकही नऊ दिवस उभ्याची नवरात्र करतात
नाथांची सेवा जितकी कडक कराल, तितकं फळ चांगलं मिळतं अशी उपासकांची मान्यता आहे. गावकरी मानतात की अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते. विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात. मुस्लीम बांधवही हाच उपवास पाळतात. ‘देव जातीपातीचा नसतो’… असं सांगत तेही नऊ दिवस देवीसमोर उभे राहतात. ही भक्ती, हा त्याग, ही श्रद्धा – यासाठी पांडे गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते. देवीवरची ही अनोखी आस्था पाहायची असेल. तर तुम्हालाही एकदा या गावात यावंच लागेल.