आधी ७ खासदार भाजपत गेले आता पंजाबच्या भगवंत मान सरकारला मोठा झटका…
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष दिल्लीच्या सत्तेतून पायउतार झाला, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांचे राज्यसभेतील ७ खासदार भाजपत दाखल झाले. त्यानंतर आता ईडीच्या कारवाईमुळं पंजाबमधील या पक्षाच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळं आता आपची अवस्था महाराष्ट्रातील शिवसेनेसारखी होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यासाठी भाजपकडं बोट दाखवलं जात आहे.
नेमकं काय झालं?
पंजाबचे मंत्री संजीव अरोडा यांना ईडीनं अटक केली आहे. शनिवारी सकाळी अरोडा यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांची छापेमारी सुरु होती. सेक्टर दोनमध्ये अरोडा यांच्या निवासस्थानी तब्बल २० गाड्यांमधून ईडीचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग इथं पोहोचला. गेल्या महिनाभरात अरोडा यांच्यावर ईडीनं दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. यापूर्वी त्यांच्या लुधियानाच्या ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली होती.
पंजाब झुकणार नाही – CM मान
दरम्यान, ईडीच्या मान सरकारमधील मंत्र्याच्या घरावरील ईडीच्या छामेपारीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, भाजपची ईडी संजीव अरोडा यांच्या घरी आली आहे. एका वर्षात ईडीनं तिसऱ्यांदा अशी हरकत केली असून महिन्याभरात दुसऱ्यांना हे झालं आहे. तरीही त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही. मी मोदींना सांगू इच्छितो की, पंजाब गुरुंची भूमी आहे. औरंगजेब देखील याला वाकवू शकला नाही. त्याचबरोबर ही भगतसिंग यांची भूमी असून त्यांनी इंग्रजांसमोर कधीही शीर झुकवलं नाही. त्यामुळं पंजाब मोदींच्या चालीसमोर झुकणार नाही. पंजाब ईडी आणि भाजपच्या या राजकीय अनैतिक युतीला संपवून टाकेन.
यानंतर संगरुर इथं पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, पंजाबचा बंधुभाव तोडण्याची भाजपची निती कधीच यशस्वी ठरणार नाही. तसंच पंजाबींसोबत होत असलेल्या अन्यायाला हीच पंजाबची जनता कडक उत्तर देईल. भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मान म्हणाले, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपाकडून बॉम्ब स्फोट, अब्रुनुकसानीच्या नोटीसा त्याचबरोबर ईडीची रेड अशी हत्यारं वापरते. भाजप आम्हाला अब्रुनुकसानीचं कारण सांगून भाजप आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्हाला याची पर्वा नाही, उलट मोदी सकारनं आपली हुकुमशाही आणि अशा कुप्त्या शोधून काढणं थांबवायला हवेत.
