
मोदी सरकारला धक्का; गृह विभाग तोंडावर पडला…
पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील दोन कुटुंबातील सहा व्यक्तींना बांगलादेशातून परत आणण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं दिले आहेत. सहा जणांना बांगलादेशी ठरवण्यात आलं होतं.
त्यानंतर त्यांना देशाबाहेर काढण्यात आलं. यावरुन राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीका केली आहे. बंगाली नागरिकांविरोधात क्रूर आणि पद्धतशीरपणे अभियान राबवण्यात येत असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे.
या प्रकरणात भोदू शेख आणि अमीर खान यांच्याकडून दोन पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती आणि न्यायमूर्ती रीतोब्रत मित्रा यांच्या बेंचनं निकाल दिला. डिपोर्ट करण्यात आलेल्या सहा जणांना ४ आठवड्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये परत आणा, असे आदेश न्यायालायानं दिले. हा निर्णय केंद्र सरकारसाठी धक्का मानला जात आहे. डिपोर्टेशनची कारवाई मंत्री अमित शहांच्या गृह मंत्रालयाकडून केली जाते.
दोन्ही प्रकरणांमध्ये गृह मंत्रालयाच्या २ मे २०२५ रोजी जारी करण्यात प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं. न्यायालयानं सहा जणांच्या नागरिकत्त्वावर कोणताही निकाल दिलेला नाही. पण सहा जणांना देशाबाहेर काढताना प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालं. सहा जणांना बांगलादेशात पाठवताना योग्य प्रक्रियेचं पालन झालेलं नाही, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.
‘डिपोर्ट करताना घाईत कारवाई करणं हे स्पष्ट उल्लंघन आहे. कायद्याच्या दृष्टीनं ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आम्ही डिपोर्टेशनची कारवाई रद्द करत आहोते. ही कारवाई घाईघाईत करण्यात आली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी २ मे २०२५ रोजी गृह मंत्रालयानं घालून दिलेल्या प्रक्रियेचं स्पष्टपणे उल्लंघन केल्याचा संशय निर्माण होतो,’ असं न्यायालयानं आदेशात नमूद केलं.
याचिकाकर्ता भोदू शेख यांनी त्यांची लेक सुनाली खातून शेख, जावई दानिश शेख आणि अल्पवयीन नातवाला परत आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. तर आमिर खान यांनी त्यांची बहीण स्विटी बिबी आणि तिची मुलं कुर्बान शेख आणि इमाम दिवान यांना माघारी आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. यातील सोनाली बिबी आठ महिन्यांची गर्भवती आहे.
पश्चिम बंगालच्या बिरभूममध्ये राहणाऱ्या सुनाली खातून आणि स्विटी बिबी दिल्लीत काम करत होत्या. यावर्षी जूनमध्ये तिच्या कुटुंबाला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी बांगलादेशला करण्यात आली. तिथे या कुटुंबांना तुरुंगात ठेवण्यात आलं.