
शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ; काय सांगितले कारण…
सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी काळा ठरला. या महिन्यातील अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. हातातोडांशी आलेला घास हिसकावला गेला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
अतिवृष्टीने शेताला तळ्याचे स्वरुप आले. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेती खरडून गेली. पीकांचं सर्वात मोठं नुकसान झालं. नद्यांच्या काठालगतच्या शेती वाहून गेली. शेतकऱ्यांनी एकरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली. पण सरकारने अद्याप भरीव मदत केलेली नाही. केंद्र सरकारकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप केंद्राकडून घोषणा करण्यात आली नाही. अजून केंद्राची मदत पोहचली नाही. त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केले.
मदतनिधीसाठी शेतकऱ्यांकडून वसुली
साखर कारखान्यांची बैठक बोलवली आहे. त्यात जे नुकसान झाले आहे, त्याविषयी राज्य आणि केंद्राशी कसा सुसंवाद साधावा याविषयीची चर्चा होईल. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मला आश्चर्य याचं वाटतं की, ज्याचं नुकसान झालं. त्यांना मदत करण्याऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्याचा निर्णय घेतला. ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्यांनी या निर्णयाचा फेरनिर्णय घ्यावा अशी विनंती करणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
केंद्राची मदत अद्याप का नाही?
राज्यावर निसर्ग कोपला आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले. त्यांनी राज्याची परिस्थिती मांडली. तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहिल्यादेवीनगरच्या दौऱ्यावर आहेत. पण तरीही केंद्राने राज्याला अद्याप मदत जाहीर केलेली नाही याविषयी पत्रकारांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी आपण केंद्राशी याविषयी संपर्क साधला. त्यावेळी केंद्राने आपल्याला असं सांगितलं की अद्याप अंतिम प्रस्ताव राज्य सरकारने दिलेला नाही, असा दावा पवारांनी केला. त्यामुळे याविषयी भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने लवकर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी पवारांनी केली.
70 लाख एकराहून अधिक पिकांचं नुकसान
गेल्या आठवड्यात राज्याचे कृषीमंत्र्यांनी जवळजवळ 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान राज्यात झाल्याची माहिती भरणे यांनी दिली. नदीकाठची, ओढ्याकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जमीनच वाहून गेली आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झालं आहे. गावात पाणी शिरले आहे. घराची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली होती. पण मदतीचे घोडे कुठं अडलं यावरून शेतकऱ्यांची नाराजी वाढल्याचे दिसते.