
उंडाळकर; वाठारकर अन् सुनील पाटलांची हातमिळवणी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून आरक्षणासह मतदार याद्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
त्याअंतर्गत कऱ्हाड तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहेत. रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राजेश पाटील-वाठारकर आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे आणि बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील हे कालचे कट्टर विरोधक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यातून राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो हेच दिसून आले आहे. त्यामुळे जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांच्याही भुवाया उंचावल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कऱ्हाड तालुक्यातील ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जानेवारी २०२६ ची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे निवडणूक विभागही अॅक्टिव्ह झाला आहे. नगरपालिकांचे दोन सदस्यीय प्रभाग रचना, गट-गण यांची रचना अंतिम करण्यात आली असुन उमेदवारीसाठीचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती यांचेही आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणूक विभागाकडून एकीकडे ही कार्यवाही सुरु असतानाच दुसरीकडे तालुक्यातील नेत्यांनीही राजकीय जुळवाजुळव सुरु केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येत्या तीन महिन्यात होत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवार म्हणुन इच्छुक असणार्यांच्या वर्षावापासून लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमीत्ताने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलत असल्याचे दिसत आहे. कऱ्हाड तालुक्यातील जेष्ठ नेते, माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर आणि जनता बॅंकेचे प्रमुख (कै) विलासराव पाटील-वाठारकर यांच्या गटाचे पहिल्यापासुन अखेरपर्यंत वैरत्व राहिले. त्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात निवडणुकाही लढवल्या होत्या. त्याचबरोवर (कै) उंडाळकर आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांचेही कायमच वैरत्व राहिले. त्यांच्यानंतरच्या पुढच्या पिढीने मात्र वैरत्व विसरुन आगामी राजकारणाची पावले ओळखुन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातुन सध्या कट्टर विरोधक असणारे अॅड. उदयसिंह उंडाळकर, राजेश वाठारकर आणि सुनिल पाटील हे एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येत नुकताच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा घेत यापुढील काळात राजकारणात मतभेद विसरुन एकत्र येत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकटीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार केला आहे. युवा नेत्यांचे अनेक वर्षानंतर झालेले मनोमिलन हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्वाचे मानले जात आहे.
झेडपी, पंचायत समितीसाठी चाचपणी :
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये अॅड. उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने तालुक्यात पहिल्यांदाच त्या पक्षाला त्यांच्या गटाची ताकद मिळाली आहे. त्यामुळे यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमधुन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यादृष्टीने अॅड. उंडाळकर यांच्याकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.