उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला.
या प्रकरणाची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणावर आज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पार्थ पवार यांच्याकडून खुलासा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच जर नियमबाह्य काही झाले नसेल तर त्यांची बदनामी करणे चुकीचे असल्याचे सांगितले.
माध्यमांसोबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “उद्योग विभागाशी आणि एमआयडीसी विभागाचा यामध्ये काहीकी संबंध आहे असे मला वाटत नाही. अनेक सेक्टरांना आम्ही सवलती देतो, मुद्रांक शुल्कमध्ये सवलती दिल्या जातात. पण ही सवलत आयटी विभागामध्ये द्यायची नाही ही आमची भूमिका आहे. यामुळे याचा आमच्याशी काही संबंध नाही हेच आम्हाला वाटले होते, तरीही मी आज याची पूर्ण माहिती घेतली, असंही उदय सामंत म्हणाले.
“मुद्रांक शुल्क रद्द करणे ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्यामधून काही गोष्टी नियमबाह्य घडल्या असतील. त्या घडल्या आहेत की नाही हे मला माहित नाही. त्यामुळेच त्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असेल. पण, थेट पार्थ पवार यांच्यासोबत संबंध जोडत असताना आपण त्यांच्याकडून खुलासा घेणे गरजेचे आहे. जर नियमबाह्य काही झालं नसेल तर पार्थ पवार यांची बदनामी करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे आपण त्याच्यांशी चर्चा करावी. त्यांच्याकडून खुलासे घ्यावेत, असंही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


