चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; घटनेनं हळहळ…
चंद्रपूर: चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा नियतक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात बुधवारी सायंकाळी शेतकऱ्याचा बळी गेला आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झाल्याच्या घटनेतील संख्या ३८वर पोहचली आहे.
दरम्यान, २८ ऑक्टोबरला शिवरा येथील व्याघ्रहल्ल्याच्या घटनेतील वाघ हाच असल्याचा अंदाज वनविभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
डोमा ईश्वर भरडे (५२), असे मृताचे नाव आहे. डोमा हे दुपारी बारा वाजताच्या सुमारास शंकरपूर-आंबोली मार्गावरील ठाणा रीट परिसरातील शेतावर गेले होते. मात्र सायंकाळ होऊनही घरी परतले नाही. नातेवाइकांनी शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांची सायकल शेतात उभी आढळली. संशय निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने शोध मोहीम राबविली परिसरात रक्ताचे डाग आणि फाटलेले कपडे आढळल्याने सर्वजण त्या दिशेने गेले. थोड्या अंतरावर डोमा यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोहचत पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी परिसरात पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची ३० हजार रुपये रोख व ९ लाख ७० हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. हल्लेखोर वाघाची प्रतिमा टिपण्यासाठी वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गस्त वाढविण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाची ओळख पटल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत सूत्रांनी दिले आहेत.
दीड महिन्यांत तीन बळी
हल्लेखोर वाघाने या परिसराच्या पाच किमीच्या परिघात दीड महिन्यांत तिसरा बळी घेतला आहे. १८ सप्टेंबर रोजी लावारी येथील विद्या कैलास मसराम, २८ ऑक्टोबर रोजी शिवरा नीलकंठ भुरे यांचा बळी घेतला. यानंतर पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. आधीच्या घटनेतील वाघ जेरबंद झाला असून २८ ऑक्टोबर व या घटनेतील वाघ एकच असल्याचे बोलले जात आहे.


