दिल्ली स्फोट घडवून आणणाऱ्यांना मोदींचा भूतानहून इशारा…
भूतान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भीषण कार स्फोटाचा उल्लेख करत, या हल्ल्यामागे असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे. मोदी यांनी पीडित कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून, या घटनेने संपूर्ण देश व्यथित झाल्याचे म्हटले आहे.
त्यांनी रात्री उशिरापर्यंत तपास यंत्रणांशी संपर्कात राहून या घटनेचा आढावा घेतला. या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (11 नोव्हेंबर) भूतानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला. “आज मी येथे खूप जड अंतःकरणाने आलो आहे,” असे ते म्हणाले. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भीषण घटनेने सर्वांच्या मनाला व्यथित केले आहे. मी पीडित कुटुंबांचे दुःख समजतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे, असंही ते म्हणाले.
या प्रकरणावर आणि तपासावर पंतप्रधान मोदी यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. मी काल रात्रभर या घटनेच्या तपासात गुंतलेल्या सर्व यंत्रणांशी, सर्व महत्त्वाच्या लोकांशी संपर्कात होतो. विचारविनिमय सुरू होता. माहिती घेतली जात होती, लिंक्स जोडल्या जात होत्या, असे त्यांनी सांगितले.
आमच्या यंत्रणा या षडयंत्राच्या मुळापर्यंत जातील. हे कट रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, या घटनेसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना शिक्षा मिळेल, असंही ते म्हणाले.
दिल्लीतील या बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेला भीषण म्हटले आहे. मी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे, असंही त्यांनी म्हटले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भूतान दौऱ्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. आजचा दिवस भूतानसाठी, भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले.शतकांपासून भारत आणि भूतानचे खूपच चांगले, आत्मीय आणि सांस्कृतिक नातं आहे आणि म्हणूनच या महत्त्वाच्या प्रसंगात सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे होते, असंही मोदी म्हणाले.


