ठाकरे गटाच्या माजी खासदाराला कुठल्याही क्षणी अटक का ?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. कुठल्याही क्षणी उन्मेष पाटील यांच्यासह दोघांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.”देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला. बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलं, त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा कुठलाही भागीदार नाही. मी जामीनदार होतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मला नंबर एकचा आरोपी करण्यात आलं आहे” असं उन्मेष पाटील आपली बाजू मांडताना म्हणाले.
मी या कंपनीचा कुठलाही भाग नसताना, राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला विचारायचं आहे, पार्थ पवार 99% भागीदार तिथे गुन्हा दाखल होत नाही.गिरीश महाजन यांच्या कुटुंबाच्या नावाने बी. एच. आर. चे ॲसेट खरेदी केले जातात, ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात खरेदी केल्या जातात. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. वरद इन्फ्रा चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे तसेच सुप्रीमो कंपनी टॅक्स, ॲसेट नाही, तरी शेकडो कोटीच्या जमिनी माफक दराने कशा घेतात? त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का?” असे प्रश्न उन्मेष पाटील यांनी विचारले आहेत.
देवा भाऊ हा न्याय कुठला?
वरद इन्फ्राला तीन-चार कोटीच्या व्हॅल्युएशन असलेल्या ॲसेट आधारावर याच बँकेने 12 कोटीचे कर्ज दिले, त्यावर गुन्हा दाखल होत नाही. मी जामीनदार होतो, कर्जाच्या पाचपट माझ्या प्रॉपर्टी अटॅच केल्या आहेत. कर्जाच्या 10% व्हॅल्युएशन नसणाऱ्यांना दहापट कर्ज दिले जातं. देवा भाऊ हा न्याय कुठला? जेव्हा मी बी.एच.आर. वर बोलतो, तेव्हा यांना झोमतं आणि तीन दिवसात माझ्यावर गुन्हा दाखल होतो. इतक्या महिन्यांपासून माझ्यावर गुन्हा दाखल का झाला नाही? तीनच दिवसात गुन्हा कसा दाखल झाला?” असे उन्मेष पाटील यांचे सवाल आहेत.
ही प्रवृत्ती बदला घेण्यामध्ये मग्न
मंगेश चव्हाण, गिरीश महाजन, बँकेचे चेअरमन, बँकेचे एमडी, बँकेचे मॅनेजर, रिकवरी ऑफिसर यांचे CDR आर तपासात उन्मेष पाटलांची मागणी. मंगेश चव्हाण भाजपचे आमदार, गिरीश महाजन भाजपाचे मंत्री, देवगिरी बँकेचे चेअरमन भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहेत.भाजपशी माझा वाद आणि वैर नव्हतच. भाजपतील या प्रवृत्ती विरोधात माझा लढा होता. ही प्रवृत्ती बदला घेण्यामध्ये मग्न होती.एकनाथ खडसे, सुरेश जैन यांना या प्रवृत्तीने काढले. या प्रवृत्ती विरोधात मी होतो. यांच्यासोबत मी काम करू शकत नव्हतो. भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला सोडून स्वाभिमानाच्या लढाईसाठी सज्ज झालो. मला कल्पना होती, अनेकांना जसं गोवण्यात आलं तसं मलाही गोवण्यात येईल. माझ्या मनाची पूर्ण तयारी होती असं उन्मेष पाटील म्हणाले.


