प्रचार केलेल्या मतदार संघातील उमेदवार आघाडीवर…
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(NDA) एक हाती विजयश्री खेचून आणल्याचे चित्र आहे. बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील जवळपास 61 मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार केला होता. त्यापैकी आता 49 मतदार संघांवर प्रभाव पडल्याचे दिसत आहे. 49 मतदार संघांमध्ये एनडीएचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा चांगला प्रभाव पडला असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील 7 जिल्ह्यातील काही मतदारसंघात प्रचार केला होता. त्यामध्ये सारन, सिवान, पाटणा, मुझफ्फरपूर, सहरसा, खगडिया, समस्तीपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. त्यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये काही प्रचार सभा आणि रॅली काढल्या होत्या. सारन येथील 10 पैकी 9 एनडीए उमेदवार आघाडीवर आहेत. सिवानमध्ये 8 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर, पाटणामधील 14 पैकी ११ एनडीएचे उमेदवार आघाडीवर, मुझफ्फरपूर- 11 पैकी 10 एनडीए उमेदवार आमदार, सहरसामध्ये 4 पैकी 3 एनडीए उमेदवार आघाडीवर, खगडियात 4 पैकी चारही एनडीए उमेदवार आघाडीवर आणि समस्तीपूर 10 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. एकूण आकडेवारी पाहाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचा चांगला प्रभाव पडल्याचे चित्र आहे.
आरजेडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
निकालात एनडीएला बहुमत मिळताना स्पष्ट होत असल्याने खबरदारी म्हणून आरजेडी कार्यालयाबाहेर बीएसएफ आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. आरजेडीचे कार्यकर्ते आरजेडी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
देवेंद्रजी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेले तेथे प्रचंड प्रतिसाद- मेघना बोर्डीकर
देशाची जनता मोदीजींच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. हे बिहारच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. अमित भाई मुंबईला आले होते तेव्हाच त्यांनी प्रेडिक्शन केला होता की भारी बहुमत बिहार निवडणुकीत आम्हाला मिळणार आहे. काट्याची टक्कर म्हणणारे सगळे निवडणूक पंडित आता तोंडघशी पडले आहेत. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी देखील बिहार विधानसभेचे प्रभारी होते, या निवडणुकीत ही देवेंद्रजी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेले तेथे प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला. आणि आता देवेंद्रजी ज्याच्या ठिकाणी प्रचाराला गेले होते तेथे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती कळते असे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.


