गडचिरोली -विजय शेडमाके.
गडचिरोली:-
. महाराष्ट्र शासनाच्या ‘विकसित विदर्भ’ दृष्टीकोनाशी सुसंगत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात ‘नीव’ (NEEV – Nurturing Equitable Empowerment & Livelihoods in Vidarbha) प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व प्रधान या संस्थेमध्ये दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा व प्रधान संस्थेचे कार्यकारी संचालक श्री सरोज महापात्रा यांनी करारावर स्वाक्षरी केली.
हा उपक्रम टाटा ट्रस्टच्या सहभागातून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत (२०२५–२०३०) राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सुमारे १५,००० ग्रामीण व आदिवासी कुटुंबांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून पुनरुत्पादक शेती पद्धतींचा प्रसार, जलस्रोत विकास व संवर्धन, वनाधारित उपजीविकांचे बळकटीकरण, पशुधन व मत्स्यपालनाला चालना तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील संस्थांचे सशक्तीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा या प्रकल्पाचा हेतू आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर नियोजन प्रणाली मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सामंजस्य कराराद्वारे प्रधान संस्था व गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयाधिष्ठित अंमलबजावणी, उपजीविका उपक्रमांची प्रभावी देखरेख आणि क्षमता विकास यासाठी औपचारिक चौकट निश्चित करण्यात आली आहे.
एमओयू स्वाक्षरी समारंभास जिल्हाधिकारी श्री अविश्यंत पांडा प्रधान संस्थेचे श्री सरोज महापात्रा (कार्यकारी संचालक), डॉ. हर्षा वशिष्ठ (सीओई लीड), श्री कुंतल मुखर्जी तसेच श्री दिगंबर चौधरी उपस्थित होते.
