दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
साखर आयुक्तांपर्यंत भांडून राष्ट्रवादीने नऊ जणांचे अर्ज वैध ठरविले होते, त्यातीलच सहा जणांनी माघार घेतली
भोर (कापूरहोळ): मोठा गाजावाजा करत भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आलेले राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप , शिवसेना यांना नामुष्कीला सामोरे जावे लागले. साखर आयुक्तांपर्यंत भांडून राष्ट्रवादीने नऊ जणांचे अर्ज वैध ठरविले होते, त्यातीलच सहा जणांनी माघार घेतली. तसेच, इतर १३ जणांनी म्हणजे १९ जणांनी माघार घेतल्याने आमदार थोपटे गटाच्या १० उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे.
भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आता तीन गटांमधील ७ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या ११ उमेदवारांमध्ये सत्ताधारी कॉग्रेसच्या सात जणांचा, राष्ट्रवादीच्या तिघांचा, तर भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बिनविरोध निवडले गेलेले १० उमेदवार हे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील ११ उमेदवारांची यादी आणि चिन्हांचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी गुरुवारी (ता.१९ मे) वाटप केले.
निवडणुकीतील उमेदवार ः गट क्रमांक- १ भोर देवपाल (२ जागा), रामचंद्र पर्वती कुडले (राष्ट्रवादी), सुभाष मारुती कोंढाळकर (कॉग्रेस), उत्तम नामदेव थोपटे (कॉग्रेस). गट क्रमांक २ येवली-हातवे बुद्रूक (३ जागा)- सुधीर चिंतामण खोपडे (कॉग्रेस), पंडीत रघुनाथ बाठे(राष्ट्रवादी), विलास अमृतराव बांदल (भाजप), सोमनाथ गणपत वचकल(कॉग्रेस), पोपटराव नारायण सुके(कॉग्रेस). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत (२ जागा) – रामदास किसन गायकवाड(राष्ट्रवादी), दिनकर सोनबा धरपाळे(कॉग्रेस), प्रताप धोंडीबा शिळीमकर(कॉग्रेस) यांचा समावेश आहे.
थोपटे गटाचे बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे ः गट क्रमांक ३ (सारोळा-गुणंद-खंडाळा)- किसन दौलतराव सोनवणे व दत्तात्रेय दिनकर चव्हाण. गट क्रमांक ४ (कापूरव्होळ-वेळू-हवेली)-विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे. मतदारसंघ ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- आमदार संग्राम थोपटे. अनुसुचित जाती-जमाती- अशोक कोंडीबा शेलार. महिला राखीव प्रतिनिधी- सुरेखा अमोल निगडे व शोभा हरिभाऊ जाधव. इतर मागास प्रवर्ग- संदीप किशोर नगिने. भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.
राजगड साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले होते. त्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने साखर आयुक्तांकडे अपील करण्यात आले होते. साखर आयुक्तांनी ११ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते, त्यामुळे कारखान्याची निवडणूक चुरशीची होण्याची चर्चा रंगली होती. मात्र, वैध ठरलेल्या ९ उमेदवारांपैकी सहा जणांनी माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. आता निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांकडून राष्ट्रवादीचे २ आणि भाजपचा १, तर काँग्रेसच्या सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
