
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मुंबई : दि.२४. राज्यसभा निवडणुकीची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.ही जागा कोणाला मिळणार याचीही उत्सुकता आहे. मात्र, शिवसेना राज्यसभेसाठी सहावा उमेदवार कोल्हापुरातूनच देण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरच्या संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेत हालचाली सुरु आहेत. राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह राज्यसभेसाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे. संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यावर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेत हालचाली सुरु आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने जादाची मते अपक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले संभाजी राजे यांना देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर शिवसेना जो उमेदवार देईल त्यालाच पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे संभाजीराजे यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. चार जागा निवडणून आणण्याएवढी महाविकास आघाडी सरकाकड मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेला मदत करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यसभेसाठीची तिसरी जागा भाजपने लढवल्यास फोडाफोडी करावी लागणार आहे. त्यातच संभाजीराजे यांनी सहावी जागा अपक्ष लढवण्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आपले मत संभाजीराजेंच्या पारड्यात टाकते की शिवसेनेला मदत करणार याची उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. महाविकास आघाडीकडे चार जागा जिंकून येऊन शकतात एवढी मते आहेत. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८आणि अपक्ष ८असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे.
तर विरोधी पक्ष भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. संख्याबळानुसार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपने लढवल्यास मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.