
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी काल कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट 6 टक्के असून राज्याच्या रेटमध्ये वाढ झाली असून तो 3 टक्के झाल्याचे व्यास यांनी यावेळी सांगितले. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या आणि ते व्यवस्थित आहेत हे पाहण्याचेही निर्देश दिले आहेत. याशिवाय या रूग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून तेवाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.