
दै.चालु वार्ता
जालनाप्रतिनिधीआकाश माने
पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी बैलांना विक्रीसाठी बाजारात दाखल केले आहे. पण बैलांच्या दरात घसरण झाली आहे.
जालना : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून लांबल्याने शेतीची कामे आटोपून शेतकरी आभाळाकडे आस लावून बसलाय. पण मृग नक्षत्र संपत आल तरी देखील पाऊसाने हजेरी लावली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडलीय. वातावरणाचा अंदाज पाहून जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या सर्जा-राजाला बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. मात्र, बाजारात गेल्यानंतर बैलांना योग्य दर मिळत नसल्याचं दिसून येत आहे.
जून महिना शेवटाकडे वाटचाल करत असून अद्यापही मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ झालीय. जिल्ह्यातील रामनगर या मोठ्या बैल बाजारात बैलांच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळतंय. सध्या जनावरांना चारा आणि पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसतेय. मात्र खरेदीदार फिरकत नाहीये. यामुळे जनावरांचे 20 ते 25 टक्के दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
जनावरांना टाकण्यासाठी चारा नाही
सध्या पाऊस पाणी नाहीये. त्यामुळे लागवड रखडली आहे. शेतात सगळी कामे उरकून घेतली आहेत. आता जनावरांना टाकण्यासाठी चारा नाहीये. विकत घेतलेला चारा संपला. त्यामुळे नवीन चारा विकत घेऊन बैलांना खाऊ घालने शक्य नाहीये. आधीच आर्थिक अडचण आहे. बी बियाणे आणि खत खरेदी साठी बैलांना बाजारात आणून चार दाम येतील आणि पेरणीची चिंता मिटेल या अपेक्षेने मी आलो होतो. दोन महिन्यांपूर्वी 60 हजारात घेतलेली बैलजोड आता व्यापारी केवळ 40 ते 45 हजारात मागत आहेत. चारा पाण्याची व्यवस्था नसल्याने आम्हाला या बैलांना बाजाराचा रस्ता दाखवावा लागला. सरकारने चारा छावण्या सुर केल्यातर सोयीचं होईल, असं शेतकरी रामा गाढवे यांनी सांगितले.
बैलांच्या दरात किती झाली घट
पाऊस लांबल्याने याचा परिणाम शेतीसारख्या व्यवसायावर प्रकर्षाने जाणवत आहे. चारा टंचाईमुळे शेतकरी बैलांना विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत. जालना जिल्ह्यातील रामनगर बाजारात बैलांच्या किंमतीत 20 ते 25 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.