
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) : दर्यापूर शहरातील बस स्थानक चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ताकदीने हाताळले.तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर,अशिक्षित व्यक्ती,अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय,कथा,नाट्य,लोकनात्य, कादंबऱ्या,चित्रपट,पोवाडे,लावण्या,वग,गवळण,प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते.पोवाडे,लावण्या,गीतं,पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला.लोकशाहीर अण्णाभाऊ यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली.त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.अण्णाभाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या.त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने,धान्य लुटून गरिबांना,दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण पाहायला मिळते.‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही.कोळसेवाला,घरगडी,खाण कामगार,डोअर किपर,हमाल,रंग कामगार,मजूर,तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या असून अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले.याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली असे यावेळी गोपाल चंदन यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची प्रचिती दिली.
यावेळी प्रसंगी प्रमुख उपस्थिती गोपाल चंदन-भाजपा दर्यापूर विधानसभा प्रमुख तथा अमरावती जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा,मदन पाटील बायस्कार-भा.ज.पा दर्यापूर ग्रामीण अध्यक्ष,अतुल गोळे-भा.ज.पा महाराष्ट्र प्रदेश सदस्य,रवींद्र ढोकणे-भा.ज.पा दर्यापूर शहर अध्यक्ष,प्रदीप मलीये,विजयराव मेंढे,रवींद्र राजपूत,पंजाब खंडारे,ज्ञानेश्वर पाथरे,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.